
अहिल्यानगर, दि. २६:
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या आढावा बैठकीत समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनावर आणि विशेषतः अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या पशुधनाला गोशाळांकडून प्रवेश नाकारल्याच्या तक्रारींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर आणि उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी गोशाळा संचालकांना सक्त निर्देश दिले. ते म्हणाले की, अनाथ किंवा अवैध वाहतुकीतून जप्त केलेल्या गायवर्गीय पशुधनाला गोशाळांमध्ये दाखल करून घेण्यास अनेकदा नकार दिला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असून, असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित गोशाळांवर नियमानुसार तातडीने कारवाई करावी. याशिवाय, अशा गोशाळांना शासनाचे कोणतेही अनुदान मिळण्यासाठी शिफारस करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पाळीव प्राण्यांच्या दुकानांची नोंदणी आणि शर्यतींवर बंदी… जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील पाळीव प्राण्यांच्या आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांची तातडीने नोंदणी करण्याचे आदेश दिले. तसेच, नियमबाह्य आणि विनापरवाना आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडा आणि घोड्यांच्या शर्यतींवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली.
भटक्या प्राण्यांचे लसीकरण आणि व्यवस्थापन… शहरांमध्ये आढळणाऱ्या भटक्या पशुधनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. पशुसंवर्धन विभागाने रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या प्राण्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांनी जिल्ह्यामध्ये ५२ गोशाळा नोंदणीकृत असून, त्यापैकी ३२ गोशाळांना परिपोषण योजनेअंतर्गत आणि १९ गोशाळांना मूलभूत सुविधा उभारणीसाठी शासनाचे आर्थिक सहाय्य मिळाल्याची माहिती दिली.


