
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी महायुती कटिबद्ध असून आगामी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला जनतेने साथ दिल्यास शहराच्या विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.

खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आमदार खताळ यांनी नुकतीच संगमनेर नगरपरिषदेमार्फत पंचायत समितीजवळ सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत ते काम चार-पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ट्रकचालक आणि क्लिनर यांच्यासाठी टर्मिनलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
खताळ म्हणाले की, संगमनेर शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल. या निधीचा उपयोग शहराच्या विविध भागांतील समस्या सोडवण्यासाठी केला जाईल. शहरातील नवीन नगर रोडचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालय अधीक्षक राजेश गुंजाळ, शिवसेना शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, ज्ञानेश्वर कर्पे, जावेद जहागीरदार, शौकत जहागीरदार, रोहित चौधरी, सौरभ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


