
संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जोर्वे ग्रामपंचायतीमधील अनागोंदी कारभार आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ गुरुवारी (२६ जून) आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या आंदोलनांची दखल न घेतल्याने संतप्त गावकऱ्यांनी थेट पंचायत समितीवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. एका महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतीवर पालकमंत्री विखे यांच्या गटाची सत्ता आहे. या काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपयांच्या वस्तूंची खरेदी कागदोपत्री दाखवण्यात आली आहे, मात्र त्या वस्तू प्रत्यक्षात गावात आलेल्याच नाहीत. गावातील रस्त्यांची कामे झाल्याचे दाखवून निधी उचलण्यात आला आहे, परंतु प्रत्यक्षात रस्ते झाले नाहीत. तसेच, लाखो रुपयांची बाकडे आणि कुंड्यांची खरेदी फक्त कागदावरच असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ग्रामसभेतही सत्ताधाऱ्यांनी पळ काढला- ग्रामपंचायतीच्या या अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामस्थ मागील अनेक महिन्यांपासून आवाज उठवत आहेत. यापूर्वी तीन वेळा ग्रामसभेतही ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. भ्रष्टाचाराची मोठी यादीच त्यांनी ग्रामसभेत वाचून दाखवली. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासनाने या प्रश्नावर ठोस उत्तर न देता पळ काढला. राजकीय दबावामुळे कोणतीही चौकशी होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर पंचायत समितीवर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले.

गरीब आणि आदिवासींच्या पैशांची अफरातफर- मोर्चादरम्यान ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती देत, राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींनी गरीब आणि आदिवासी नागरिकांच्या पैशांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप केला. आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आमरण उपोषणाचा इशारा- सर्व ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत, झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची तात्काळ आणि निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. येत्या एका महिन्यात संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास, संपूर्ण जोर्वे गाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करेल, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव, सुरेश थोरात, आण्णासाहेब थोरात, हौशीराम दिघे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड, रावसाहेब दिघे, रावसाहेब काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव, राजू बलसाने, संजय थोरात, सुखदेव चव्हाण, पुंजाहरी दिघे, हरिभाऊ इंगळे, सोपान कोल्हे, गोरख काकड, संतोष जाधव, संपत थोरात, विठ्ठल काकड, राजू शेख, राहुल बोरकर, अनिल गायकवाड, रावसाहेब यादव, सागर भवर, भाऊसाहेब दिघे, प्रमोद इंगळे, डॉ. प्रवीण काकड, अक्षय दिघे, बंटी यादव, गणेश इंगळे, योगेश जोशी, वसंत बोरकर, संदीप काकड, संदीप इंगळे, अनिल थोरात, अमोल क्षीरसागर, विद्रोही संघटनेचे अध्यक्ष भास्कर बर्डे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी थोरात, मनीषा दिघे, संगीता थोरात, मंगल काकड, जयश्री दिघे, मंगल दिघे, लता बर्डे, ज्योती थोरात, अनिता काकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

