
संगमनेर, प्रतिनिधी:
पद्मशाली समाज संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज असून त्याचा प्रत्येक समाज बांधवाला अभिमान आहे. येथील समाज बांधवांचे ऐक्य पाहून आनंद झाल्याचे प्रतिपादन ‘लय आवडतेस तू मला’ फेम अभिनेते तन्मय जक्का यांनी केले.
अभिनेते तन्मय जक्का आणि एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी यांच्या उपस्थितीत रविवारी (२२ जून) मालपाणी उत्सव हॉल येथे संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक व विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी, आणि संगमनेरच्या विवाहित महिलांचा (लाडक्या लेकी) गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष, ओबीसी नेते जितेंद्र कांचानी उपस्थित होते.
या सोहळ्यात इयत्ता पहिली ते बारावी तसेच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रांत विशेष नैपुण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा आणि विवाहित ‘लाडक्या लेकीं’चाही सन्मान करण्यात आला.
तन्मय जक्का यांनी पद्मशाली समाजाचे ऐक्य पाहून आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. जितेंद्र कांचानी यांनी देखील समाजाच्या निस्वार्थ समाजसेवा आणि एकोप्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजाचे अध्यक्ष गणेश मादास यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच उपाध्यक्ष शांताराम आडेप आणि शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी ‘लाडक्या लेकी’ हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. यावेळी पापय्या सिरसुल्ला, चंद्रशेखर झुंजूर, चंद्रकांत एनगंदुल, अरविंद पगडाल, मधुकर वनम, दत्तात्रय इटप, सुनील मादास, नारायण इटप, महिला अध्यक्षा कविता सिरसुल्ला, युवक अध्यक्ष अंबादास आडेप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन आदर्श शिक्षक प्रकाश वनम सर आणि मीनाक्षी श्रीपतवाड यांनी समाजातील इतर शिक्षकांच्या मदतीने केले होते. पद्मशाली समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक संघटना यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी नरेंद्र आडेप, दत्तात्रय पगडाल, रमेश वनम, राम चन्ना, अनिल अन्नलदास, प्रकाश वनम, राजू बुरा, शंकर गुंडेटी, अजय श्रीपतवाड, विनोद झुंजूर, विशाल एनगंदुल, श्रीकांत बिज्जा, एकनाथ श्रीपत, कल्पना एनगंदुल, अलका आडेप, यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.






