
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेरमधील गुंजाळ मळा परिसरात सुरू असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार अमोल खताळ यांच्यावर होत असलेली टीका खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्याच्या उद्देशाने नुकतीच या ट्रक टर्मिनलला भेट दिली होती. पंचायत समितीजवळील या कामाची गती कमी असल्याने, त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना कामाला गती देण्यासोबतच कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कामाचे श्रेय घेण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आमदार खताळ हे तालुक्याच्या विकासकामांवर वेगाने लक्ष केंद्रित करत असल्याने एका विचलित झालेल्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून त्यांच्यावर खोटी टीका केल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. हे टीका करणारे कार्यकर्ते खताळ यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
केंद्र सरकारच्या निधीतून संगमनेर नगर परिषदेमार्फत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून या ट्रक टर्मिनलचे काम सुरू आहे. मागील वर्षी या कामाला मंजुरी मिळाली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कामाची गती अतिशय कमी आहे. याच कारणामुळे आमदार खताळ यांनी मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली.
आमदारांवर टीका करणाऱ्या पत्रकात असा उल्लेख होता की, “ट्रक टर्मिनलचे काम कोणी केले, जमीन देण्यासाठी स्थानिकांची कशी मदत झाली, याबाबतची माहिती घ्या मग श्रेय घ्या.” यावर पलटवार करत स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, ही टीका म्हणजे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या टर्मिनलसाठी जागा देण्यामध्ये स्थानिक नागरिकांची सामूहिक भूमिका नव्हती, तर एकाच कुटुंबाने ही जागा दिली आहे.

ठेकेदार आणि कामाबद्दल संशय?
पत्रकात गंभीर आरोप करण्यात आले आहेत की, या कामाचा ठेकेदार वेगळा असून तो कामाकडे फिरकतही नाही. ज्या कुटुंबाने जागा दिली आहे, तेच प्रत्यक्षात हे काम करत आहेत. टीका करणाऱ्या नेत्याने आपल्या समर्थकांना हे काम दिले असून, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर त्यांचे लक्ष आहे, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. शिवम गुंजाळ, अक्षय गुंजाळ आणि अभिजीत घाडगे यांच्या सह्या असलेले हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

