संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटार स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहेत.

दिल्ली नाका येथील नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार काँक्रिटीकरण आणि सर्व्हिस रोड तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार खताळ म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून शहरावर ज्यांची सत्ता होती, त्यांनी गटारी आणि रस्त्यांच्या कामाचे ठेके त्यांच्याच ठेकेदारांना दिले. मोर्चा काढायलाही तेच ठेकेदार पुढे होते. त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची माहिती माझ्या कार्यालयात द्या. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडू.
दिल्ली नाका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्व्हिस रोडची गरज असल्याचे आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडले होते. त्यांनी तात्काळ नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेतून १ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला, यामुळे या कामाची सुरुवात झाली आहे.

आमदार खताळ यांनी “न खाऊंगा, ना खाने दूंगा” या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, ठेकेदारांना काम वेळेत आणि चांगल्या दर्जाचे करण्याचे निर्देश दिले. कामाचा दर्जा उत्तम राहील याची खात्री प्रशासनाने करावी, असेही ते म्हणाले. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी आमदार खताळ यांनी एसटीपी प्लांटच्या (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. काही लोक शहरात एसटीपी प्लांट उभारण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तो प्लांट शहराबाहेर हलवण्यासाठी आपण नागरिकांच्या सोबत राहू, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ॲड. श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे दादा गुंजाळ, रोहित चौधरी, वरद बागुल, ऋषिकेश मुळे, सौरभ देशमुख, राहुल भोईर, गोकुळ दिघे, नासिर शेख, बबलू काझी, मजहर शेख, मुझफ्फर जहागीरदार, कांचन ढोरे, मेघा भगत, रेश्मा खांडरे उषा कपिले, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रास्ताविक केले, तर नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी आभार मानले.


