संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहर आणि तालुका हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच एकसंध परिवार म्हणून राहिला आहे, मात्र काही लोक राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून यंग नॅशनल ग्राउंडच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, हे काम कोणी थांबवले, हे सर्वांना माहीत आहे, असे अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख यांनी म्हटले आहे.

जावेद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विभागात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. एसटीपी प्लांटच्या जागेचा वाद असो किंवा इतर विकासकामे, नेतृत्वाने नेहमीच सर्व जनतेला आपले मानून काम केले आहे. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज आणि अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘महायुती सरकारने केवळ राजकारणासाठी काम थांबवले’
नॅशनल यंग ग्राउंड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ग्राउंडच्या विकासासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून १ कोटी रुपयांचा निधी मिळवला आणि कामाला सुरुवातही झाली. परंतु, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर केवळ राजकारणासाठी हे काम थांबवण्यात आले, असा थेट आरोप शेख यांनी केला. सर्व तरुणांना हे चांगलेच माहीत आहे, त्यामुळे कोणीही भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करू नये. नवीन लोकप्रतिनिधींनी नवीन निधी आणून विकासकामे करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

‘स्वच्छतेच्या लौकिकाला धक्का’
स्वच्छता आणि विकासकामांसाठी संगमनेर नगरपालिकेने राज्यात लौकिक मिळवला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असतानाही नगरपालिकेला स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले, तसेच १० कोटी रुपयांची बक्षिसेही मिळाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महायुतीतील सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन काम करत असताना, शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे. यामुळे स्वच्छ आणि सुंदर शहराचा लौकिक कमी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत, डासांचे प्रमाण वाढले आहे आणि घंटागाडी वेळेवर येत नाही.
या गंभीर परिस्थितीवर राजकारण करणे दुर्दैवी आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला तातडीने सूचना देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी विविध प्रभागांतील नागरिकांनी केली आहे. संगमनेरचा लौकिक चांगल्या कामांमुळे आहे, त्यामुळे राजकारणासाठी चुकीचे आरोप करून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करू नये, असेही जावेद शेख यांनी शेवटी म्हटले आहे.


