संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली.

संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील तरतुदींमधून पळवाट काढून कत्तलखाना चालक-मालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाची बाब म्हणजे, संगमनेर पोलिसांनी आतापर्यंत गोवंश हत्या आणि कत्तलखान्यांच्या प्रकरणात एकाही कत्तलखाना चालक-मालकावर महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम (MPDA) अंतर्गत कारवाई केलेली नाही. असे असतानाही, संगमनेरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तशी कारवाई केल्याची खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली आहे, असे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करावे, तसेच या माहितीची खातरजमा न करणारे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही सक्त ताकीद देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
याव्यतिरिक्त, आमदार खताळ यांनी संगमनेर शहरातील इतर अवैध धंद्यांकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि झोपडपट्टी परिसरात अवैध गुटखा, मादक पदार्थ, नशेच्या गोळ्या, सिगारेट, तसेच अफू, गांजा यांची पानटपरींवर खुलेआम विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. मटका आणि ऑनलाईन जुगाराकडे बेरोजगार तरुणांच्या रांगा लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री राजरोसपणे सुरू आहे, संगमनेरची तरुण पिढी नासविण्याचे हे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त करत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आमदार खताळ यांनी केली.


