मुंबई, दि. २ जुलै २०२५:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कधीही न झालेल्या थेट मुलाखतींद्वारे तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आणि ॲड. गणेश पाटील यांचा समावेश आहे. पक्ष निरीक्षकांनी केलेल्या शिफारसी आणि मुलाखतींच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.

या पारदर्शक प्रक्रियेमुळे पक्षात नवचैतन्य संचारले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अकोला (८), बुलढाणा (१९), चंद्रपूर (२), जळगाव (८), सिंधुदुर्ग (१), उल्हासनगर (१), रत्नागिरी (६), ठाणे शहर (३), ठाणे ग्रामीण (५), अहिल्यानगर (३), सांगली (२), पुणे (२), सोलापूर (१), अमरावती (२), धाराशिव (१), जालना (७), हिंगोली (२), छत्रपती संभाजीनगर (६), बीड (३), यवतमाळ (१) अशा विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित तालुक्यांमधील नियुक्त्या लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दिली.


