संगमनेर, प्रतिनिधी:
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याच परंपरेला पुढे नेत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीनराव मनोहर शिंदे आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांचीही निवड झाली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय फटांगरे यांनी यापूर्वी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभारले होते. तसेच, बोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर, त्यांनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपदही भूषवले आहे.
बोटा गटात त्यांनी सातत्याने विविध विकास योजना राबवून लोकांमध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०२५ रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. याच बैठकीत नितीन मनोहर शिंदे आणि रिजवान शेख यांच्या निवडीचीही घोषणा करण्यात आली.

या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, पांडुरंग घुले, बाबा ओहोळ, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, गौरव डोंगरे, हैदर अली, जावेद शेख यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
नवनियुक्त अध्यक्ष अजय फटांगरे यांनी या निवडीनंतर आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, “माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला असून, मला एक मोठी संधी दिली आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडणार आहे. काँग्रेस हा राज्यघटना आणि देशहिताचा विचार आहे. युवक या विचारापासून काहीसे दुरावले असून, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळात थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्रियतेने आणि जोमाने काम करून तालुका व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा प्रथम क्रमांकावर नेऊ.” त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.



