संगमनेर, प्रतिनिधी:
ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवक आणि युवतींनी पंढरपूरच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. ‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन या युवा कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवांसह विविध सेवा पुरवून दोन दिवस त्यांची निःस्वार्थपणे सेवा केली.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व विविध सेवा- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक पायी दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखालील या युवा पथकाने संगमनेर, अहिल्यानगर मार्गे प्रवास करत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे टेंभुर्णी येथे दर्शन घेतले. त्यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता, जेवण वाढणे आणि इतर अनेक सेवा पुरवल्या. अहिल्यानगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक पायी दिंड्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ७० किलोमीटरच्या या प्रवासात या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांशी संवाद साधला, मुक्कामात सहभाग घेतला, स्वयंपाक आणि वाढपामध्ये मदत केली, स्वच्छता अभियानात सक्रिय योगदान दिले आणि आरोग्य तपासणी केली. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि विविध गावांमध्ये त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम वारकरी संप्रदायाची विचारधारा जपली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “मानवता हा धर्म जोपासणारा वारकरी विचार आहे, यामध्ये लहान-मोठा, उच्च-नीच, जात असा कोणताही भेदभाव नाही. सर्वजण ‘माऊली’ म्हणून एकमेकांचा आदर करतात, पाया पडतात. संत-महात्म्यांनी सुरू केलेली पायी दिंडी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा असून ती संपूर्ण जगाला एकतेचा संदेश देत आहे.”

यावेळी त्यांनी विविध ठिकाणी कीर्तनकार, सहभागी महिला वारकरी, वृद्ध आणि युवकांशी संवाद साधला. ‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन युवकांनी केलेली सेवा सर्वत्र कौतुकास्पद ठरली. या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करकम येथील रिंगणामध्येही सहभाग घेत वारकरी रिंगणाचा आनंद लुटला. या रिंगणामध्ये ‘माऊली माऊली’च्या गजरात डॉ. जयश्री थोरात डोक्यावर तुळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या. या रिंगणासाठी सुमारे अडीच लाख वारकरी उपस्थित होते.
थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाची परंपरा – खासदार निलेश लंके
“थोरात परिवाराला समाजकार्याची आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन समाज विकासाचे काम केले आहे आणि हीच शिकवण वारकरी संप्रदायाने दिली आहे. गोरगरिबांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात तरुणांनी वारीमध्ये सहभाग घेऊन सेवा दिली, हा कौतुकास्पद उपक्रम आहे.” यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात या सर्व संगमनेरच्या वारकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी राणीताई लंके आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


