मुंबई:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा गैरवापर करत पात्र नसतानाही लाभ घेणाऱ्या २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल केली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असून, आता या महिलांकडून घेतलेली रक्कम परत घेतली जाणार आहे.
अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं की, २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या नियमांचे उल्लंघन करत मासिक १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. या महिलांना मिळणारा लाभ तातडीने थांबवण्यात आला आहे. शासनाच्या अंदाजानुसार, या गैरवापरामुळे सुमारे ३ कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही सर्व रक्कम संबंधित महिलांकडून वसूल केली जाईल, असंही तटकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मूळ उद्देश गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करणे हा आहे. शासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता नाही, तरीही त्यांनी हा लाभ घेतला. हा प्रकार समोर आल्याने योजनेची पारदर्शकता आणि योग्य गरजूंपर्यंत लाभ पोहोचवण्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल. तसेच, लाभ घेण्याची अट मोडणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल.’
या प्रकरणामुळे सरकारने तात्काळ पाऊले उचलली असून, भविष्यात योजनेचा चुकीचा वापर टाळण्यासाठी डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार आहे. यामुळे केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री केली जाईल.


