संगमनेर, प्रतिनिधी:
“काँग्रेसचा विचार हा जनकल्याणाचा शाश्वत विचार असून, संगमनेर तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. तालुक्यात काही लोक दांडगाई करू पाहत आहेत, त्यांना वेळीच रोखले पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींना येणाऱ्या काळात सडेतोड उत्तर द्यावेच लागेल,” असे कणखर प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात, मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे, डॉ. जयश्री थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, अर्चना बालोडे, संपतराव डोंगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्याच्या सुसंस्कृत परंपरेला धक्का लावणाऱ्यांना रोखणारच!
थोरात पुढे म्हणाले, संगमनेर तालुक्याला संघर्षाचा इतिहास आहे. अनेक वर्षांच्या कामातून हा तालुका उभा राहिला आहे आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा ही आपली ओळख आहे. मात्र सध्या तालुक्यात चुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येऊन या दांडगाईचा आणि दमदाटीचा बंदोबस्त करावा लागेल. आपण सुसंस्कृत असलो तरी, कोणी चुकीचे वागत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यावर कार्यकर्त्यांनी ठाम झाले पाहिजे.
अनेक लोक समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच उत्तर देणे आवश्यक आहे. तालुक्याची सुसंस्कृत राजकीय संस्कृती टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपसातील मतभेद बाजूला ठेवून जनकल्याणाचा आणि संतांचा विचार असलेल्या काँग्रेसच्या शाश्वत विचाराने प्रत्येकाने काम करावे, असेही थोरात यांनी सांगितले.
एकत्रितपणे काम करून काँग्रेसला वैभव प्राप्त करून देऊ: अजय फटांगरे
नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे म्हणाले की, माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण कायम काँग्रेस पक्षाचा विचार खेडोपाडी नेण्यासाठी काम केले आहे. पक्षाने आणि नेतृत्वाने मोठी संधी दिली आहे. आपली ताकद मोठी असून, एकत्रितपणे संघर्षाच्या काळात काम करून पुन्हा काँग्रेसला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू.
मावळते अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून, आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. यापुढील काळातही थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निष्ठावंतपणे काम करू, असे सांगितले. यावेळी युवक काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांसाठी वारीचा अनुभव संस्मरणीय ठरला – डॉ. जयश्री थोरात
या कार्यक्रमात बोलताना डॉ. जयश्री थोरात यांनी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ५०० युवक वारीमध्ये सहभागी झाल्याचे सांगितले. अभंग, फुगड्या आणि भजन अशा विठ्ठलाच्या नामाचा गजर करत या वारीमध्ये सर्वजण स्वतःला विसरून सहभागी झाले होते. “जीवनात एकदा तरी वारी करावी,” असे सांगताना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड झालेली वाहतूक कोंडी हटवण्यासाठी संगमनेरच्या युवा वारकऱ्यांनी केलेली मदत कौतुकास्पद ठरली. वारीचा अनुभव हा सर्वांसाठी जीवनात मोठा अनमोल ठेवा ठरला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी युवा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
चुकीच्या गोष्टींना सडेतोड उत्तर देऊ; संगमनेरची सुसंस्कृत परंपरा जपण्याची युवकांना हाक! – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अनेक लोक समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच उत्तर देणे आवश्यक आहे.



सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे काँग्रेसचे नूतन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात
एकत्रितपणे काम करून काँग्रेसला वैभव प्राप्त करून देऊ: अजय फटांगरे
युवकांसाठी वारीचा अनुभव संस्मरणीय ठरला – डॉ. जयश्री थोरात