
अहिल्यानगर:
अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या १५९ व्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांतील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. १९७० मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामध्ये निळवंडे धरण, ७० किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आणि ८५ किलोमीटर लांबीचा डावा कालवा यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून वर्षाला १०.५ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन विभागाने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निळवंडे प्रकल्पाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळेच लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले असल्याचे विखे यांनी म्हटलं आहे.


