

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे एकाच दिवशी पती-पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम असून, आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शेती आणि निवृत्ती वेतनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. मुली सासरी असतात, तर मुलगा नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. त्यामुळे रेवजी आणि नंदा हे दोघेच घरी राहत होते.
गुरुवारी (१० जुलै २०२५) सकाळपासून निमगावजाळी येथे राहणाऱ्या त्यांच्या विवाहित मुलीने अनेकदा आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने जवळच राहणाऱ्या चुलतभावाला त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. चुलतभावाने रेवजी यांच्या घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, रेवजी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला दिसला. तर, काही अंतरावर असलेल्या घराजवळच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेहांना प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री उशिरा गोगलगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
रेवजी आणि नंदा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कोणी विष दिले, तसेच नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचाही घातपात झाला, या सर्व शक्यतांचा तपास आश्वी पोलीस करत आहेत.



गुरुवारी (१० जुलै २०२५) सकाळपासून निमगावजाळी येथे राहणाऱ्या त्यांच्या
