

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफसफाईच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नियमानुसार शासनाकडून ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, जीव धोक्यात घालून पवार याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी सभागृहात केली.

यावेळी सभागृहात बोलताना खताळ म्हणाले, ‘गटारातील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा’ अस्तित्वात असतानाही संबंधित ठेकेदाराने या कायद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्या होत्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साहाय्याने करणे आवश्यक असताना, ठेकेदाराने अतुल पवारला कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता चेंबरमध्ये उतरवले. चेंबरमधील विषारी वायूमुळे पवारचा गुदमरून मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या रियाजलाही आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेमुळे दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी ठाम भूमिका आमदार खताळ यांनी विधानसभेत मांडली.


