

‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्यांनो, हिंमत असेल तर ऊर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वत:च ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून आपटून मारू, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? कोणते उद्योग तुमच्याकडे आहेत? अशी दर्पोक्ती करणारा निशिकांत दुबे हा राज्यातल्या सरकारचा मानद जावई वाटू लागला आहे. त्याच्या या वक्तव्याने ज्याचं मस्तक भडकणार नाही, तो मराठी कसला? अनेक वर्षं महाराष्ट्रात राहणार्या असंख्य अमराठी तरुणांनी या मानद जावयाची चांगलीच उतरवली आहे. मराठीमध्ये मानद या पदनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. एकार्थी ही व्यक्ती वर्तणुकीने कशीही असली तरी तिला दोष द्यायचा नाही, अशी यामागची मानसिकता. राज्यात या निशिकांतचा सर्वत्र निषेध होत असताना भाजप मात्र त्याच्याबाबत मूग गिळून आहे. दुबे नावाचा इसम महाराष्ट्र सरकारचा मानस जावई वाटण्याचं कारण हेच आहे. या माणसाचा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत खार वेस्टला झुलेलाल इमारतीत चार कोटींचा चक्क सोळाशे चौरस फुटांचा फ्लॅट आहे. एस्सार कंपनीचा एकेकाळचा महाराष्ट्राचा प्रमुख असलेल्या या माणसाने या राज्यात राहून कोट्यवधी कमावले. तरीही त्याला महाराष्ट्र राज्य हे भिकेकंगाल वाटतं. इतकं सारं असूनही भाजपचे नेते आणि सत्तेतले मंत्री त्याच्याविषयी फार काही बोलत नाहीत. म्हणूनच सरकारी मानद जावई पदाला तो शोभून दिसतो. मानद जावई जिथे खिदडतील तिथे असेच ओकतील. हा मानस जावई इतका शेफारलाय की त्याने काहीही केलं तरी दोष देण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही.
झारखंडचा भाजपचा खासदार असलेल्या या माणसाने मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्राला दिलेली दुषणं पाहिली की कोणाही मराठी माणसाच्या मस्तकात आग जायला हवी. तमाम मराठी माणसाने त्याला द्यायचे शाप दिले. पण महाराष्ट्र सरकार काही जागचं हललं नाही. एव्हाना कोणी विरोधकाने मोदी, शहांना प्रश्न विचारले तर ज्यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा असते त्याऐवजी सत्तेतले निर्लज्ज त्याचा खुलासा करतात. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे, चित्रा वाघ यांच्यासारखे पुढे होतात. अगदी राहुल गांधींनी काही वक्तव्यं केलं की त्यावर खुलासा करण्याचा अधिकार जणू याच मंडळींना दिलेला असतो. मात्र महाराष्ट्राची इभ्रत रस्त्यावर आणणार्या दुबेविषयी बोलायची हिंमत यांच्यात नाही. खरं तर दुबेच्या प्रतापाचे खुलासे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: करायला हवे होते. महाराष्ट्र ही काय चीज आहे, याची जाणीव स्वत: मुख्यमंत्र्यांनी दुबेला करून दिली असती तर महाराष्ट्रावरचं भाजपचं प्रेम दिसून आलं असतं. उलट दुबेच्या वक्तव्याचा अर्थ शब्दश: तसा नाही, असा खुलासा करत मुख्यमंत्र्यांनी त्याचं समर्थनच केलं. तो म्हणतो ते महाराष्ट्रातील लोकांविषयी नव्हे, काही संस्थांविषयी त्याचं हे मत असल्याचं सांगून फडणवीसांनी आपलं महाराष्ट्रावरचं ‘प्रेम’ दाखवून दिलं.
भाजप नेत्यांची हाराकिरी इतक्या टोकाला गेलीय की मोदींसाठी जो लोळण घेईल त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची राज्यातल्या भाजप नेत्यांनी मानसिकता बनली आहे. निशिकांत म्हणतो इतका महाराष्ट्र दुबळा आहे? त्याला स्वत्व नाही? त्याच्याहून उत्तर प्रदेश आणि बिहार वरचढ आहेत? तो जे म्हणतोय त्याला भाजपचंही समर्थन आहे की नाही? नसेल तर सत्तेवर टीका करणार्या नेत्यांचे पुतळे जाळणारे भाजपचे नेते निशिकांतला गोंजारतात कसे?
हा दुबे भलताच प्रतापी आहे. राजस्थानच्या प्रताप युनिर्व्हसिटीतून बोगस पदवी प्राप्त केल्याचा आरोप त्याच्यावर सतत होत आला आहे. अर्थात अशी खोटारडी पदवी धारण केलेला कधी ते मान्य करत नसतो. पुलवामाचा हल्ला हा याच माणसाच्या मुर्खपणामुळे झाला. हल्ला झाला त्या एक दिवस आधी या माणसाने आपल्या लग्नाचा वाढदिवस गुलमर्ग येथे साजरा केला होता. देशातील भाजपच्या मोठ्या नेत्यांना या वाढदिवसाला पाचारण करण्यात आलं होतं. इतक्या मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न होता. यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना मोठ्यासंख्येने गुलमर्गमध्ये आणण्यात आलं होतं. पहेलगाम, सोनमार्ग, गांधारबल अशा अतिसंवेदनशील क्षेत्रातील जवान गुलमर्गमध्ये हलवण्यात आल्याचा फायदा अतिरेक्यांनी घेतला आणि 26 जणांचा नाहक बळी गेला. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्याला जराही जाब विचारला नाही. या प्रतापाची साधी लाज या माणसाला नाही. आपल्या कृत्यावर त्याने साधा माफीचा एक शब्द उच्चारला नाही. अर्धी हयात मुंबईत घालवलेल्या या माणसाची 2009 च्या निवडणुकीवेळची मालमत्ता 10 कोटी 10 लाख होती. ती 64 कोटींनी वाढलीय. इतकी मालमत्ता कुठून आली याचा लेखाजोखा येण्याआधीच संसदेने या माणसाला 2025 चा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरवलं.
आठ दंगलीच्या गुन्ह्यांची नोंद असलेला हा माणूस स्वत: दंगलखोर असूनही या माणसाने देशात होणार्या दंगलींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राजीव खन्नांना जबाबदार धरलं. तेव्हाही त्याला ना सत्तेने जाब विचारला ना न्याय यंत्रणेने. विशाल तिवारींसारख्या काही वकिलांनी निशिकांतवर न्यायालयाच्या बेअबदीची केस टाकली तेव्हा ती नाकारताना न्यायालयाने अशांना पुरून उरायला आमचे खांदे सक्षम आहेत, असं म्हणत याचिका फेटाळली होती. शेफारलेल्या निशिकांतने ‘दिल के अरमां आंसुओं में बह गए’ अशी टिपण्णी करत आपल्यातला मुर्दाडपणा दाखवून दिला होता.
या माणसाने माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांना तर मुस्लिम आयुक्त संबोधलं. राहुल गांधींविषयी मनाला येईल असं वक्तव्यं करणं सोनिया गांधींवर अश्लाघ्य टीका करण्याचा या निशिकांतचा हातखंडा आहे. विरोधी पक्षांच्या सरकारांनी घेतलेले निर्णय रोखून धरणार्या राज्यपालांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा नाराजी व्यक्त केली. तामीळनाडूच्या राज्यपालानेही हेच उपद्व्याप केले आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. तेव्हा न्यायालयाने अशी बिलं तीन महिन्यात हातावेगळी करावी लागतील, असं राज्यपालांना बजावलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपण्णीनंतर निशिकांतने मध्येच तोंड घातलं आणि सर्वोच्च न्यायालयाची नियत काढली. सर्वोच्च न्यायालय मर्यादेबाहेर जात असल्याचं तो म्हणाला होता. प्रत्येक कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर संसद आणि विधानमंडळ बंद करा असं वक्तव्य त्याने केलं होतं.
महाराष्ट्राच्या विषयावरील त्याच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत असला तरी त्याने आपलं वक्तव्यं मागे घेतलेलं नाही हे विशेष. तो म्हणतो माझं म्हणणं मी खरं करून दाखवेन. आता तर त्याने मनसे, उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना त्या पक्षांची तुलना दहशतवादी सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि दाऊद इब्राहीमशी केली. जिथे मुंबईचा पालकमंत्री भाईंदरच्या आंदोलनाची तुलना पहेलगामच्या दहशतवादी कृत्याशी करत असेल तर निशिकांतच्या वक्तव्यांचीच त्याने री ओढली असं म्हणता येईल. इतके उपद्व्याप करणारा हा खासदार केवळ संसद सदस्यच नाही त्याला भाजपने वित्त, गृह, दूरसंचार, पर्यटन या मंत्रालयाच्या स्थायी समितीवर घेतलं आहे. काय म्हणायचं याला?




भाजप नेत्यांची हाराकिरी इतक्या टोकाला गेलीय की मोदींसाठी
या माणसाने माजी निवडणूक आयुक्त