
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे.
आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे.

भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आमदार खताळ यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पूरचारीची (ज्यावर पळसखेडे, निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, सोनोशी, वाटमाई देवी, आणि गीते वस्ती हे भाग अवलंबून आहेत) पाहणी केली. निमोण येथील तलावाचे जलपूजनही आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार खताळ यांनी सांगितले की, जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असल्याने आता पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर करून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. निमोण आणि तळेगाव या दुष्काळी भागातील गावांना हक्काचे पाणी मिळवून देणे, हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर तिगाव माथ्यापर्यंत या पूरचारीचे पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपअभियंता सुभाष पगारे, शाखा अभियंता शरद नागरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रल्हाद शिंदे, जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक, सनी पगार यांच्यासह पूरचारीच्या लाभक्षेत्रातील गावातील शेतकरी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महायुती सरकारचे धोरण प्रत्येक गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्याचे असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. तसेच, निमोण येथील जगदंबा माता मंदिराच्या विकासासाठी प्रस्ताव दिल्यास, जिल्हा नियोजनच्या बैठकीत या मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून निमोण गावातील २६ बंधाऱ्यांच्या खोलीकरणाचे काम मंजूर झाले होते, त्यापैकी २० ते २२ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्या बंधाऱ्यांमध्ये आता भोजापूर पूरचारीचे पाणी आल्याने निमोणकरांना पाण्याची चिंता करण्याची गरज नाही.

