

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
मुंबई/संगमनेर:
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून, गेल्या वर्षभरापासून शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्मारकाचे स्वप्न अजूनही अपूर्णच असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संगमनेर बस स्थानकावर स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि नगरपालिकेने निधीसाठी प्रस्तावही पाठवला.

सुरुवातीला, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) च्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून डीपीटीसीमधूनच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर लक्षात आले की, अशा कामांसाठी डीपीटीसीमधून निधी देता येत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला.
या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले. शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा यासंबंधी मार्गदर्शक सूचनाही जारी केलेल्या नाहीत. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न केवळ कागदावरच राहिले आहे. आमदार तांबे यांनी शासनाला या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून हे ऐतिहासिक स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल.


