

संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसच्या फिटनेसचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे चंदनापुरी घाट परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती, यामुळे स्कूल बस पलटी होऊन अपघात झाला आणि त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले. अपघातग्रस्त बसला परिवहन विभागाकडून परवानगी होती का, याची चौकशी करण्याची स्पष्ट मागणी आमदार खताळ यांनी केली. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे तातडीने सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट करण्याची मागणी केली आहे.


