

संगमनेर, प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील सहकारी संकल्पना ही जागतिक स्तरावर नावाजली जात असून, सहकारातूनच सामान्य माणसाची खरी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी केले.
विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार दिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सहकार दिंडी व सहकार परिसंवादात बारी बोलत होते.
राजहंस दूध संघापासून सुरू झालेली ही दिंडी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून अमृतवाहिनी बँकेपर्यंत काढण्यात आली. “विना सहकार, नाही उद्धार” या घोषणांनी अमृत उद्योग समूह दुमदुमून गेला. या दिंडीमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, चंद्रशेखर बारी, रणजीतसिंह देशमुख, थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चंद्रशेखर बारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) सहकाराची दखल घेतली असून, हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. दूध उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून, एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज 40 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. सहकार क्षेत्रात युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सहकारी संस्थांनी विपणनासोबतच सेवांचा विस्तार केल्यास अधिकाधिक नागरिक सहकाराकडे आकर्षित होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठीही दिशादर्शक ठरला आहे. भाऊसाहेब थोरात यांनी रुजवलेली सहकाराची तत्त्वे आदर्शवत असून देशाने त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. सहकार टिकला तरच शेतकरी टिकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सहकाराने ग्रामीण भागात समृद्धी आणली असून, शासनाने बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सहकार अधिक समृद्ध करण्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रणजीतसिंह देशमुख यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सुरुवातीला दररोज 1500 लिटर दूध संकलित करणारा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आज सुमारे 4 लाख लिटर दूध संकलन करत आहे. तालुक्यात 200 दूध संकलन डेऱ्या कार्यरत असून, संघाची वार्षिक उलाढाल सुमारे 550 कोटी रुपये आहे. यामुळे दरमहा साधारणतः 50 कोटी रुपये दूध उत्पादनातून तालुक्यात येत असून बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. आगामी काळात खाजगीकरणाची मोठी स्पर्धा असून, युवकांना सहकार चळवळीचे महत्त्व समजावून त्यांना यात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चांगले नेतृत्व असेल तर सहकार चांगला राहतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका असून, ही सहकाराची पंढरी राज्यासाठी मार्गदर्शक ठरणारी असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारे यांनी केले. नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास कवडे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक, शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक