
संगमनेर, प्रतिनिधी:
सध्याच्या तरुण पिढीने मोबाईलवरील ‘रील’ बनण्याऐवजी जीवनात ‘रियल’ आदर्श निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. छत्रपती प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. कांगणे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानण्याचे आवाहन तरुणांना केले. ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर जागरूकतेसाठी करावा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नये. दुर्दैवाने आजच्या पिढीचे आदर्श बदलत असून, तरुणांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी. क्षणिक प्रसिद्धीच्या मागे न लागता कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवन बदलता येते, असे त्यांनी अधोरेखित केले.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचे कौतुक
यावेळी प्रा. कांगणे यांनी माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. १९८५ पासून सलग आठ वेळा विधानसभेत राहून त्यांनी राजकारणाला सुसंस्कृत केले, असे ते म्हणाले. थोरात यांचा पराभव विचार करायला लावणारा असून, ते एका आदर्श नेत्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता
प्रा. विठ्ठल कांगणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने कोणत्याही व्यासपीठावर जाता येते, याचे उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिले. स्वामी विवेकानंद यांनीही जागतिक शिकागो परिषदेत जगाला बंधुत्वाची शिकवण दिली होती, असे ते म्हणाले. पालकांनीही आपल्या मुलांच्या संगतीकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले, कारण बिघडलेली संगत आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात यांचे मार्गदर्शन
यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सर्वांसाठीच मार्गदर्शक असून, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक पराक्रम केले. पुरोगामी विचार हे आपले विचार असून, सोशल मीडियाद्वारे तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी छत्रपती प्रतिष्ठानच्या मुलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र पुरोगामी विचारांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांवर मोठा झाला आहे, असे सांगत त्यांनी तरुणांना जाती-धर्माच्या नावावर भडकवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर, उपाध्यक्ष ऋषिकेश काकड, अजय फटांगरे, महेश सोनवणे, संदीप गुंजाळ, खंडू सातपुते, विजय आहेर, जे.के. सातपुते, लक्ष्मणराव ढोले, डॉ. राजू मस्के, साहिल गुंजाळ, तेजस गोरडे, ललित शिंदे, ओम जाधव, शैलेश आहेर, राज काकड, चैतन्य देठे, सोहम पलोड, सोहम शिंदे, शुभम थोरात, प्रशांत पांडे, गौरव आहेर, इरफान पठाण, मयूर कांडेकर, सार्थक निकम, रितेश सोनवणे, सतीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आदर्श शिक्षक जे.के. सातपुते, आदर्श शिक्षक विनायक पाटील, अकॅडमी शिक्षक बाळासाहेब कांगणे, माजी सैनिक संदीप गुंजाळ, आणि आदर्श डॉक्टर म्हणून डॉ. राजू मस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर यांनी केले. या कार्यक्रमाला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचे कौतुक
एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात
या प्रसंगी आदर्श शिक्षक