
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
राहाता:
कर्जमाफी, सातबारा कोरा, पीक विमा आणि वीजबिल माफीसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले राहाता तालुक्यातील शेतकरी आता शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी १० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे करणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत आणि शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार आवाज उठवला जाईल.
घोगरे यांनी शेतकरी, महिला, दिव्यांग, तरुण कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गानेच पार पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी वर्गाच्या वाढत्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.


