

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही.
थोरात यांनी सरकारला तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी केली. सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, सरकारने त्वरित मदत करावी, असेही त्यांनी नमूद केले.
याचबरोबर, दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा ६००० रुपये अनुदान, शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या पलीकडे २० टक्के प्रोत्साहन रक्कम, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही, असेही म्हटले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या जन आंदोलनाला पाठिंबा दिला असून, लोकशाही मार्गाने जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.





माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या
याचबरोबर, दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा