हिंदी सक्तीच्या मुद्यावर सातत्याने पळ काढणार्या राज्यातल्या युती सरकारच्या मौनी भूमिकेचा परप्रांतीय कसा फायदा घेतात हे सातत्याने समोर येत असताना महाराष्ट्राविषयी आग ओकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडूकला खासदार निशिकांत दुबे याला भर संसदेच्या लॉबीत खडेबोल सुनावणार्या काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार रणरागिणींचं करावं तितकं कौतुक कमीच. या खासदारांनी महाराष्ट्राची मान ताठ केलीच नाही तर तमाम मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाचीही जाणीव करून दिली. इनमीन तीन महिला खासदारांच्या या अवतारामुळे सत्तेचा माज चढलेल्या निशिकांतला या महिलांच्या गराड्यातून पाय काढता घेणंही अवघड झालं आणि ‘आप हमारी बहेन है’, असं सांगत त्याला पळ काढावी लागली. मराठीबाणा काय असतो, हे दाखवणार्या धारावीच्या वर्षा गायकवाड, धुळ्याच्या शोभा बच्छाव आणि वरोरा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. हा प्रश्न एकट्या राज ठाकरेंचा वा उध्दव ठाकरेंच्या अवमानाचा नाही. जे कोणी मराठी अस्मितेचा अवमान करतील त्या प्रत्येकाला हा धडा आहे. या खासदारांनी संसदेत दाखवलेल्या रुद्रावताराचं सारा महाराष्ट्र भरभरून कौतुक करतो आहे. असं कधी संसद भवनात घडत नव्हतं. मराठीच्या मुद्यावर हे घडणं हा योगायोग असू शकत नाही. महाराष्ट्रात ज्या मुद्यावर सध्या प्रचंड चर्चा आहे त्याकडे महाराष्ट्रातल्या युती सरकारने दुर्लक्ष केलं नसतं, दुबेचा जाहीर निषेध केला असता तर संसद भवनाच्या लॉबीत महिला खासदारांना चंडीकेचं रूप घ्यावं लागलं नसतं. आपल्या पक्षाचा म्हणून दुबेला सावरणार्या राज्य सरकारला तो इशारा आहे.
माजलेल्या निशिकांतवर कोणाचाच अंकुश नाही हे आम्ही याआधीच स्पष्ट केलं होतं. तो थेट पंतप्रधानांच्या गोटातला असल्याने काहीही केलं आणि कसंही वागलं तरी आपलं काहीही बिघडत नाही, याची खात्रीच या माणसाला असल्याने तो कसाही वागतो आणि काहीही बरळतो. यातूनच त्याने मराठी बाण्याला हात घातला आणि मराठीच्या मुद्यावर त्याने आपली अक्कल चालवली. राज्यभर त्याची नाचक्की झाली. महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येकाने त्याचा चांगलाच समाचार घेतला. असं वाटत होतं त्याला अक्कल येईल. पण तो त्याहून पुढे गेला आणि आता तो वाह्यात बडबडू लागला.
खरं तर या दुबेची जागा दाखवण्याची सर्वाधिक जबाबदारी ही राज्यातल्या युती सरकारची होती. एव्हाना भाजपच्या नेत्यांविषयी वा सत्तेविषयी कोणी ब्र काढला की जागोजागी निषेध करणार्या, कधी पोस्टर्स जाळणार्या भाजपच्या मंडळींनी त्यातल्या त्यात त्या पक्षातल्या मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुबेविषयी दाखवलेला भाकडपणा उद्विघ्न करणारा आहे. लाज कोळून प्यावी तसं या कार्यकर्त्यांचं वर्तन आहे. दुबेने वाचाळपणा केला तेव्हा राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. विरोधकांकडील अशा घटनांचा फायदा घेण्यासाठी अधिवेशन डोक्यावर घेणार्या भाजपच्या आमदारांना निशिकांच्या वक्तव्याची जराही पडलेली दिसली नाही.
विरोधकांनी पायर्यांवर बसून निशिकांच्या छबीला जोडे हाणले तेव्हा राज्यातल्या जनतेला निशिकांच्या कृत्याची विधिमंडळाने घेतलेली दखल कळली. मात्र तरीही सरकार म्हणून त्याचा निषेध सत्ताधार्यांनी केलाच नाही. सत्ताधार्यांचा महाराष्ट्राप्रति असलेल्या ‘कळवळ्याचा’ हा अनोखा फंडा होय. वास्तविक ज्या प्रकारचे बोल दुबेने महाराष्ट्राला लावले ते पाहिले तर सत्ताधार्यांनीच त्याच्या निषेधाचा ठराव विधिमंडळाच्या सभागृहात आणायला हवा होता. त्याऐवजी विरोधकांनाच त्याला उघडं करावं लागलं. झोपेतून जागे झालेल्या अशिष शेलार यांनी ‘दुबे बोलतोय ते भाजपचं मत नाही’ असं सांगत सत्तेची आणि भाजपची इभ्रत वाचवण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाने एकमुखाने निषेधाचा ठराव केला असता तर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकला नसता. सत्ता असताना नामर्दपणा दाखवणार्यांची आपल्याकडे कमी नाही. तो नामर्दपणा भाजपने आणि त्या जोडीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दाखवला.
आपण सत्तेसाठी लाचार आहोत, याची जाणीव त्यांनी राज्यातल्या जनतेला या निमित्ताने करून दिली आहे. विधान परिषदेत अनील परब यांनी आणि विधानसभेत भास्कर जाधव यांनी सालटी काढली नसती तर या दुबेच्या वक्तव्यांची दखल विधानमंडळाने घेतली असती याची खात्री नव्हती. छत्रपती शिवरायांविषयी वाह्यात बोलणार्यांना स्व पक्षाच्या नेत्यांना सत्ताधार्यांनी असंच सावरलं होतं. शिवरायांपेक्षा ह्यांना सत्ता किती प्यारी आहे, याचं हे द्योतक होय. दोन अडीच वर्षांचा अपवाद वगळता राज्यात सातत्याने सत्तेवर असलेल्या फडणवीसांच्या नाकासमोर हा माणूस महाराष्ट्राची औकात काढत असताना स्वत: फडणवीसांना, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना त्याचं काहीही वाटू नये?
जिभेवर येईल ते बडबडण्याची विकृती असलेल्या या दुबेच्या पत्नीने देशाची 100 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मेडिकल कॉलेजच्या नावाने घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता बँकेला चुना लावण्याच्या प्रकरणात दुबेची पत्नी आहे. बँकेने हे प्रकरण बाहेर आणलं नसतं तर देशाला 100 कोटींच्या खायित टाकणार्या पत्नीचा हा पती नाक वर करून शहाणपण शिकवायला मोकळा झाला असता. तो आणि त्याच्या पत्नीविरोधात झारखंडमध्ये 47 गुन्हे नोंदवले गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिमांनी धोका दिल्याचा जावई शोध या निशिकांतने लावलाय. महाराष्ट्राला दिलेला दोष लपवण्यासाठी तो आता धार्मिक राजकारणाचा आसरा घेतो आहे.
राज्यभर टीका होऊनही त्याला अक्कल आलेली दिसत नाही. ईटी प्लॅटफॉर्मवर दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र हा देशाचा भाग राहिला नसल्याचं वक्तव्यं केलंय. इंग्रजांची इंग्रजी तुम्हाला पसंत आहे पण उत्तर भारतीयांची हिंदी तुम्हाला का नको, हा देवेंद्र फडणवीसांचा डायलॉग तो आता बोलू लागला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचाच हट्ट असताना त्याचा गैरफायदा दुबे घेणार नाही, असं नाही. 1956 पर्यंत मुंबई ही गुजरात्यांची होती, असं तो याच हट्टाने बोलतो आहे. 31 टक्के मराठी बोलणारे मुंबईत राहत असल्याचा त्याचा दावा कदाचित खराही असला तरी ही नगरी महाराष्ट्राची नाही, असं तो ज्या हिंमतीने बोलतो ती हिंमत त्याला राज्यातल्या सत्ताधार्यांमुळेच मिळाली हे उघड सत्य होय. महाराष्ट्राच्या आयकर कमाईत आमचा वाटा असल्याचं सांगताना मुंबईतल्या स्टेट बँकेसह लाईफ इंश्युरन्सच्या क्रेडीट डिपॉझिटचा 40 टक्के वाटा महाराष्ट्रेतरांचा असल्याचा जावई शोध त्यांनी मुलाखतीत लावला आहे.
रिलायन्स, टाटा या उद्योगांचे प्रकल्प महाराष्ट्रात नाहीत, केवळ मुख्यालय महाराष्ट्रात असल्याने करांचा भरणा महाराष्ट्रातून होत असल्याचा पुनरुच्चार त्याने केला आहे. आदित्य बिर्लांचा कोणता प्रकल्प महाराष्ट्रात आहे, अशी विचारणा तो राज्यातल्या सरकारला करतो आहे. जिंदालचं मुख्यालय महाराष्ट्रात असल्याने तिथे पैसे जमा होतो, असं तो सांगतो. महाराष्ट्र ही चित्रपटांची जननी असल्याचं वावडं त्याला आहे. तिथे हिंदी चित्रपट कसे तयार होतात, असा बालीश सवाल तो करतो. बहूअर्थी हा खासदार महाराष्ट्राला अत्यंत कमजोर समजतो. हे मोदींचं राज्य आहे, इथे तुमची दादागिरी चालणार नाही, असं सांगत तो तुम्ही मराठी मुंबईत निवडून येऊन दाखवा असं खुलं आव्हान तो देतो तेव्हा भाजपला आणि त्या पक्षात असलेल्या मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना थोडी तरी मराठीची लाज वाटायला हवी की नाही?






माजलेल्या निशिकांतवर कोणाचाच अंकुश नाही हे आम्ही याआधीच स्पष्ट केलं होतं.
विरोधकांनी पायर्यांवर बसून निशिकांच्या छबीला जोडे हाणले
जिभेवर येईल ते बडबडण्याची विकृती असलेल्या