

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त –
अनंत पांगारकर – संगमनेर:
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आमदार सत्यजित तांबे यांनी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीत कार्यरत असलेल्या तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील यांच्यासह समाजातील विविध घटकांचे ११४ प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या सर्व प्रश्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आणि आगामी काळात त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सोशल माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले.
संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयूआय या विद्यार्थी चळवळीतून काम करत ते पुढे आले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे १० वर्षे सदस्य म्हणून काम करताना विविध योजनांचा पाठपुरावा करून त्या जिल्हा परिषद गटाला मॉडेल बनवले. डॉ. सुधीर तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रात निर्माण केलेला जिव्हाळ्याचा परिवार आणि मतदारसंघाची बांधणी यामुळे त्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी नेहमीच कामाला प्राधान्य दिले असून जनतेचे सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या पावसाळी अधिवेशनात तांबे यांची १००% उपस्थिती राहिली. त्यांनी ५२ तारांकित प्रश्न उपस्थित केले, त्यापैकी ४० प्रश्न स्वीकृत झाले होते. हे सर्व प्रश्न अधिवेशनापूर्वी ऑनलाइन पद्धतीने द्यावे लागतात आणि लॉटरी पद्धतीने त्यांची निवड होते. याव्यतिरिक्त, अधिवेशन काळात त्यांनी ११ लक्षवेधी सूचना मांडल्या.
आमदार तांबे यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल सुविधेची प्रभावी मागणी केली असून, याकरता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्धा तास चालणाऱ्या चर्चेमध्ये त्यांनी ४ विषय मांडले, ज्यात शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
प्रश्नांवरून उद्भवलेल्या चर्चेवर त्यांनी ५ विषय मांडले, तसेच ५ अशासकीय ठराव विधान परिषदेत मांडले. विधिमंडळ हे कायदेमंडळ असून कायदे बनवण्याचे काम करते आणि प्रशासन त्यांची अंमलबजावणी करते. खासगी विधेयकामध्ये भावी पिढ्यांच्या शाश्वत विकासावर कायदा करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय १४ औचित्याचे मुद्दे उपस्थित केले, ९३ अन्वये ४ विशेष सूचना मांडल्या, तर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये १२ सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले.
तांबे यांनी शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न, पदवीधर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, वकील बांधवांना संरक्षण देण्याची मागणी, तसेच आदिवासी आणि झोपडपट्टी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधानसभेत मांडला. वैज्ञानिक विकास महामंडळाद्वारे अनुशेष भरून काढण्याबाबत त्यांनी विशेष मुद्दा मांडला.
शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणींवर प्रकाश टाकताना, शेततळ्यांमध्ये लहान मुले आणि जनावरे यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शेततळ्यांना कंपाऊंड करण्यासाठी अनुदान मिळावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बिबट्यांचे हल्ले आणि वीज दरवाढ यावरही त्यांनी चर्चा घडवून आणली.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून, त्यांचा इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अशी त्यांची कायम मागणी राहिली आहे. सध्या सीबीएसई अभ्यासक्रमात महाराजांचा अवघा ६८ शब्दांचा इतिहास असून, त्यात जास्तीत जास्त समावेश झाल्यास तो भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत सरकार सकारात्मक असून केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे.
राज्यातील शेतकरी, युवक, बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा अनेकांचे विविध प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले आहेत. १००% उपस्थित राहून विधिमंडळातील प्रश्नांबरोबरच विविध विभागाचे प्रश्न मंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
जनतेने दिलेल्या संधीमुळे हे काम करण्याची संधी मिळाली असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा जनतेशी असलेला ऋणानुबंध आणि त्यातून मिळालेले जनतेचे प्रेम या जोरावर मिळालेल्या संधीतून सोने करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. आगामी काळात विचारलेल्या प्रश्नांचा आणि मिळालेल्या सकारात्मक उत्तरांचा पाठपुरावा तसेच अडचणींबाबत बैठका घेणे हे आपले पहिले प्राधान्य राहील असे ते म्हणाले. आगामी काळातही प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
नाशिक-पुणे रेल्वे या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत राज्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मेट्रो शहरांमध्ये नागरिकांना वाहतूक समस्येने (ट्रॅफिक) त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संगमनेर शहरामध्येही वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, हा प्रश्न सोडवण्याकडे तांबे यांनी लक्ष वेधले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक-पुणे चौपदरी महामार्ग निर्माण झाला आहे. यासोबतच संगमनेरमध्ये विविध योजना राबवण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.




या पावसाळी अधिवेशनात तांबे यांची १००% उपस्थिती राहिली.
जनतेने दिलेल्या संधीमुळे हे काम करण्याची संधी मिळाली असून,