मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चांगले संबंध, त्यामुळे कोणतीही विकासकामे थांबणार नाहीत: आमदार सत्यजित तांबे
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
भारताची खरी ओळख एकता आणि विविधतेमध्ये आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात, आणि तिरंगा ध्वज, देश, आणि संविधान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी भगवा, हिरवा किंवा निळा ध्वज घेऊन समाजात जातीभेद निर्माण करत आहेत. अशा शक्तींना रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राजकारण हे नेहमीच तत्त्व आणि विकासावर आधारित असावे, असेही ते म्हणाले.
आज (रविवारी) संगमनेर खुर्द येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक व सभागृह सुशोभीकरण व हजरत पीर शाह शिबली चिश्ती शहीदाचे सुशोभीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अजय फटांगरे, विजय राहणे, संतोष मांडेकर, सरपंच श्वेता मंडलिक, उपसरपंच गणेश शिंदे, वैशाली सुपेकर, शैला देशमुख, गुलाब शेख, माजी सरपंच सवरग्या शिंदे, हरिभाऊ मंडलिक, सुभाष पाटील गुंजाळ, अरुण गुंजाळ, मुजम्मिल बागवान, लतीफ बागवान, भाऊसाहेब बुरकुले, सोपान गोफने, पंढरीनाथ बलसाने, विलास आव्हाड, वरुण गुंजाळ, रमेश गुंजाळ, राजेंद्र देशमुख, किसन सातपुते, सुभाष आव्हाड, प्रकाश आव्हाड, सचिन टपले, अमोल टपले, लीलाबाई टपले, अकबर शेख, उत्तम टपले यांच्यासह स्थानिक नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, संगमनेर खुर्द हे गाव म्हणजे एक छोटा भारतच आहे. इथे सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र राहतात. तिरंगा ध्वजामध्ये भगवा, हिरवा, पांढरा आणि निळा असे सर्व रंग आहेत, जे आपल्या देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे आपली प्राथमिकता तिरंगा ध्वज, देश आणि संविधान असली पाहिजे.
समाजातील विविधता आणि एकता जपण्यासाठी सर्वांनी मानवता हा धर्म पाळला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यात सर्व लोक समानतेने राहत होते. तसेच, त्यांनी ‘मराठा’ या शब्दाचा अर्थ एका विशिष्ट जातीसाठी नसून, तो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, असे स्पष्ट केले. सर्व महापुरुष, संत आणि समाजसुधारक कोणत्याही एका जातीचे नसून ते सर्वांचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत आहोत, असे सांगताना थोरात म्हणाले की, निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे कधीकाळी टँकरवर अवलंबून असलेल्या या भागात आता पाणीच पाणी आहे. यामुळे संगमनेर एक विकसित तालुका म्हणून ओळखला जातो.
सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीमुळे लोक विकासकामे विसरत आहेत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. एकेकाळी दंगलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहराला आपण शांत आणि सुव्यवस्थित शहर बनवले. मात्र, गेल्या काही काळापासून तालुक्यात पुन्हा दादागिरी आणि दहशत वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
विकासकामांची परंपरा कायम राखणार: सत्यजित तांबे
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांची प्रशंसा केली. ते म्हणाले, थोरात यांनी ४० वर्षे केलेल्या कामांमुळेच संगमनेर हा दुष्काळी तालुका विकसित झाला आहे. प्रवरा नदीचे पाणी उचलण्याचा हक्क स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी मिळवून दिला, तर बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले.
आपण जनतेच्या आशीर्वादाने विधान परिषदेत असून, मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोणतीही विकासकामे थांबणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. चाळीस वर्षांची सुसंस्कृत परंपरा आपण जपणार आहोत आणि ती कोणत्याही परिस्थितीत खराब होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. विकासकामांची ही वाटचाल सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात गणेश शिंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र गुंजाळ यांनी, सूत्रसंचालन काशिनाथ गुंजाळ यांनी केले, तर सुभाष पाटील गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी थोरात आणि तांबे यांचे गावात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.



थोरात म्हणाले की,
विकासकामांची परंपरा कायम राखणार: सत्यजित तांबे
या कार्यक्रमात गणेश शिंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र गुंजाळ यांनी, सूत्रसंचालन काशिनाथ गुंजाळ यांनी केले, तर सुभाष पाटील गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी थोरात आणि तांबे यांचे गावात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.