
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कसारा दुमाला, समनापूर आणि राजापूर येथील शेकडो कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खताळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, मंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.
या भागातील अनेक जमिनींवर आणि घरांवर ‘पोकळीस्त’ किंवा ‘इतर हक्कांतील कब्जेदार’ अशा अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर सरकारी सुविधांपासून ते वंचित राहत होते. तसेच, कौटुंबिक वाद आणि धमक्यांसारख्या समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागत होते.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे धाव घेतली. आमदार खताळ यांनी याप्रश्नी गांभीर्य लक्षात घेत, महसूलमंत्री बावनकुळे यांना सविस्तर निवेदन दिले. त्यांनी गुंजाळवाडी (गट क्र. ७९, ९२), कासारा दुमाला (गट क्र. ३२, ३६, ३७, ३८), समनापूर (गट क्र. ५६), आणि राजापूर (गट क्र. २८, ३८, ३०) या गावांमधील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची मागणी केली.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या कॅबिनेट बैठकीनंतर, आमदार खताळ यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर त्वरित बैठक घेण्याची विनंती केली. महसूलमंत्री बावनकुळे यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे मागवली आहेत आणि लवकरच बैठक घेऊन यावर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.


