

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, महिला बचत गट कर्ज आणि खेळते भांडवलाचे अनुदान वाटप डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ होत्या. तसेच महायुतीचे पदाधिकारी, लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. सुरुवातीस महिलांनी औक्षण करून डॉ. विखेंना राखी बांधली.
डॉ. सुजय विखे म्हणाले, महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून, त्या क्षमतेला दिशा देणे आपले कर्तव्य आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला व्यवसाय करून यश मिळवतील उद्या हजारो महिला त्यातून आर्थिक सक्षमता प्राप्त करू शकतात. समानतेची घोषणा अनेकदा ऐकू येते, पण घटनेने दिलेली समानता प्रत्यक्षात आणणे ही खरी जबाबदारी आहे. महिलांना वाटप होणारे साहित्य हे केवळ वस्तू नाही, तर त्यामागे त्यांचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करणारा दृष्टीकोन आहे.
संगमनेर शहरात सध्या गांजा, मटका यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिला व कुटुंबांची चिंता व्यक्त करत, डॉ. विखे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला अशा गोष्टींवर कठोर कारवाईचे आवाहन केले. ते म्हणाले, जेव्हा मुलगी घराबाहेर पडताना असुरक्षित वाटते, तेव्हा समाज म्हणून आपल्याला अंतर्मुख होवून विचार करावा लागतो. आजचे महायुती सरकार हे महिला भगिनींच्या पाठिंब्यामुळेच सत्तेवर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्व आणि मार्गदर्शनाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यशस्वीपणे जनतेसाठी काम करीत आहे. कोणताही विकास एकट्याने होत नाही. मतदारसंघात केलेल्या कामावर जनतेचा विश्वास आहे, आणि तो विश्वास तसाच राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे.
कार्यक्रमाच्या अखेरीस, डॉ. विखेंनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहाता येथे परम पूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांची शिव पुराण कथा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कथेसाठी गावनिहाय महिला गटांची नावनोंदणी सुरू करण्यात येणार असून पासद्वारे सहभागी होता येणार आहे.



डॉ. सुजय विखे म्हणाले,
