

सत्तेविरोधी ब्र काढण्याची हिंमत त्यांच्यात राहिली नाही. परिणामी प्रश्न आयोगाला कोणी विचारला की सत्ताधारी हे दलाल बनून आयोगाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागतात. सत्ताधार्यांच्या या कृतीची सर्वत्र निर्भत्सना होऊनही त्यांनी लाज सोडली नाही. असं होतं तेव्हा चोर कोण हे कोणास सांगावं लागत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयोगाच्या कारभाराची लक्तरं काढल्यावर सत्ताधारी दलालांची फौज बाहेर आली आणि त्यांनी डोक्यातली चीप, पायातली वाण आणि जिभेच्या हाडांवर मजल मारली.
इतक्याशा खोलीत किती मतदार रहावेत याला काही मर्यादा? राहुल गांधी यांनी अशा ठिकाणी राहणार्या 70 जणांचा पिच्छाच पुरवला. जयराम रेड्डी नावाची ही व्यक्ती बेलंदुरू येथील मुनरेड्डी गार्डन सोसायटीमध्ये 35 क्रमांकाच्या घरात गेल्या दोन महिन्यांपासून राहत होती. याच रेड्डीच्या घराचा पत्ता 70 मतदारांसाठी नोंदवला होता. सत्ता येईल, अशी शक्यता असलेल्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्येही असंच घडत होतं. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केवळ 65 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातही असंच घडत गेलं. लोकसभेत सत्ताधार्यांचा धोबीपछाड करणार्या इंडिया आघाडीचा दारूण पराभव केवळ अशक्यच होता. एव्हाना पाच वर्षांच्या काळात पाच लाख मतदारांची नोंद होत नाही त्या राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीत चक्क 29.5 लाख मतदारांची नव्याने नोंद झाली. जो आजवरचा विक्रम होता. महाराष्ट्राच्या आजवरच्या निवडणुकीत मतदारांची इतकी नोंद होऊ शकली नव्हती. वयाची 18 वर्षं पूर्ण करणार्या युवकाला मतदानाचा नव्याने अधिकार मिळाला तेव्हाही नोंदीचं एवढं प्रमाण नव्हतं. हि बाब कोणालाही खुपणारीच होती. आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील मतदारांची यादी आणि मतदानावेळची व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवली. ती द्यायला आयोगाने नकार दिला. तेव्हाच शंकेची पाल चुकचकली. यातच आयोगाने मतदान आणि त्यापूर्वीची व्हिडिओ चित्रिकरणं 45 दिवसात बेदखल करण्याचा निर्णय घेतला. यातून आयोगच मतदानाची चोरी करत असल्याचा संशय बळावला आणि अधिक त्रास नको म्हणून डिजिटल डेटा देण्याची मागणी करण्यात आली. तो आयोगाने नाकारला. डिजिटल डेटा देण्यात आला असता तर देशातील मतदानाची माहिती जमवणं अवघड नव्हतं. अधिकतर मतदारसंघात अशा चोर्या झाल्याचं उघड करता आलं असतं. हे लक्षात घेऊन डिजिटल डेटाची मागणी फेटाळण्यात आली.
या शोध मोहिमेत एकाच मतदाराची अनेक ठिकाणी असलेल्या नावांची संख्या 11 हजार 965 नोंदली गेली. मतदार राहत असलेल्या ठिकाणचे पत्तेच गायब असलेली प्रकरण 40 हजार 9 सापडली. लहानशा घरात 20 ते 70 मतदार नोदंवले गेलेली प्रकरणं 10 हजार 452 शोधली गेली. मतदाराचे फोटोच नसलेल्या नोंदी 4,132 आढळून आल्या. फॉर्म 6 ची नोंद ही पहिल्या मतदारासाठी केली जाते. या निवडणुकीत 33 हजार 692 जणांनी असे फॉर्म भरले आणि त्यात 70 ते 90 वर्षांचेही मतदार आढळून आले. साडेसहा लाख मतदार असलेल्या मतदारसंघात लाखावर मतदार बोगस आढळून आले. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर आयोगाची पुरती गोची झाली आहे. आता तर आयोगाच्या पोर्टलवरून मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यातील सारी माहिती हटवण्याचा प्रताप आयोगाने केला आहे. अयोगाच्या या मतचोरीने पुरती पोलखोल झाली आहे. तिला उत्तर देणं अडचणीचं जाणं हे सत्तेसाठी तापदायक असल्याने सत्तेतल्या या दलालांनी खुलाशांचा जुमला सुरू केला आहे.