

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे आणि अनिकेत घुले यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यांनी शासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. यासोबतच, त्यांनी तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि बजरंग दलावर गंभीर आरोप केले. मोकाट गुरांमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी सरकारने भरून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी अनिकेत घुले यांनी शासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. जर सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सर्व भाकड जनावरे आणि गोर्हे आणून थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सोडण्याचा इशारा त्यांनी दिला. दत्ता ढगे यांनीही, जोपर्यंत भाकड जनावरांना बाजारभावाप्रमाणे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात अजीज ओहोरा, ठाकरे शिवसेनेचे अमर कतारी, सदाशिव हासे, उद्योजक शेतकरी कैलास पानसरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने सर्व आंदोलक प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गीते गायली. बराच वेळ वाट पाहूनही प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली नाही, त्यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला. अखेरीस, आंदोलनकर्त्यांच्यावतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
- या आंदोलनादरम्यान काही वासरेही आणण्यात आली होती. आंदोलन संपल्यावर, नगरपालिका प्रशासनाने या वासरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पांजरपोळ येथे केली.




शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे आणि अनिकेत घुले यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी
या आंदोलनात अजीज ओहोरा, ठाकरे शिवसेनेचे अमर कतारी, सदाशिव हासे, उद्योजक शेतकरी कैलास पानसरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.