महाराष्ट्र सर्वात न्युज ऑनलाईन, संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज जनक्षोभ पाहायला मिळाला. तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांचा तीव्र निषेध करत, शहरातील हजारो नागरिकांनी आणि सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या निषेध सभेची सुरुवात झाली.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, स्वतःला कितीही मोठे महाराज म्हणवून घेणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असू शकत नाहीत. उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून, आरएसएस आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. अशा वक्तव्यांच्या वेळी ते मूकसंमती देत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा असून येथे अशा बेताल वक्तव्यांना कधीही माफी मिळणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. युवकांनी महाराजांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले ‘सुभेदार’ असलेल्या संजय गायकवाड यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदारांना स्थान नाही, असे ते म्हणाले. बागेश्वर सारखे स्वयंघोषित महाराज खोटा इतिहास लादून बहुजन समाजाला पुन्हा वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीत ढकलण्याचे कारस्थान रचत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजातील तरुणांनी या कपटी प्रवृत्तींना ओळखून जागृत व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, दलित पॅंथर, कम्युनिस्ट पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण संगमनेर शहरात या आंदोलनामुळे वातावरण तप्त झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा संगमनेरात तीव्र निषेध; बागेश्वर बाबा आणि आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन
बागेश्वर सारखे स्वयंघोषित महाराज खोटा इतिहास लादून बहुजन समाजाला पुन्हा वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीत ढकलण्याचे कारस्थान रचत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.






