

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर: पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जनजागृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीत पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांची अशासकीय सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १ सप्टेंबर २०१५ च्या निर्णयानुसार या समितीची स्थापना झाली असून, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे.
या समितीत खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे:
शासकीय अधिकारी: मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता (जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग), जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी.
लोकप्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्व आमदार, विधानसभा परिषद सदस्य.
पर्यावरण तज्ञ: डॉ. सुनील म्हस्के आणि डॉ. सतीश कुलकर्णी. अशासकीय प्रतिनिधी: गणेश बोऱ्हाडे यांच्यासोबतच सुरेश सोपानराव खामकर यांचीही निवड करण्यात आली आहे.
या समितीची पहिली बैठक लवकरच होणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील पर्यावरण विषयक समस्यांवर उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रमांची रूपरेषा ठरवली जाईल. गणेश बोऱ्हाडे यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्याच्या समावेशामुळे पर्यावरण चळवळीला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



या समितीत खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे:
