

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन भव्य शांती मोर्चा काढला. या वेळी, संगमनेरच्या शांततापूर्ण विकासाला खीळ घालू पाहणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची हाक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आध्यात्मिक व वारकरी संप्रदाय आणि इतर राजकीय पक्षांच्या वतीने हा भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. व्यक्तिगत बाळासाहेब थोरात यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात संगमनेरकर एकवटले होते. यशोधन कार्यालयापासून नवीन नगर रोडपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये २५ हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
या प्रसंगी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही. कोणी नथुराम म्हणून समोर येणार असेल तर विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. आम्ही हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये वाढण्यापासूनची कामे आम्ही केली आहेत. गावोगावी मंदिरांचे बांधकाम आणि सुशोभीकरण आम्ही केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.
थोरात पुढे म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी तालुक्यात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली आहे. सातत्याने विकासकामे करून तालुक्याला राज्यात अग्रस्थानी आणले आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींना हा विकास सहन होत नाही, त्यामुळे ते तालुक्यात गुंडगिरी आणि दहशत निर्माण करत आहेत. मागील आठ महिन्यांत तालुक्यात अशांतता वाढली आहे, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकप्रतिनिधीच्या डीएनए तपासावा लागेल या वक्तव्याचा ही त्यांनी समाचार घेतला.
नवीन लोकप्रतिनिधीचा संगमनेरचा विकास मोडण्यासाठी हत्यार म्हणून वापर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भगवी टोपी घालून हिंदुत्वाचा आव आणणारे निवडणुकीआधी कधी टोपी घालत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे यांनीही या वेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, संगमनेरचा विकास हा बाळासाहेब थोरात यांच्या योगदानातूनच झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची त्यांची परंपरा आहे. नवीन आमदारांनी आमचे हिंदुत्व पाहू नये. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारा हा तथाकथित कीर्तनकार आम्हाला कधीही मान्य नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे हिंदुत्ववादी आहोत. त्यांनी कार्यकर्त्यांना घाबरून न जाण्याचा सल्ला देत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
डॉ. जयश्री थोरात यांनी तरुणांवर दाखल होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांबद्दल आवाज उठवला. त्या म्हणाल्या, दहशत निर्माण करण्याचे हे प्रयत्न आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे आपला आदर्श नाही. आपले हिंदुत्व हे दिखाऊ नसून खरे आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आपण त्याच विचारांवर पुढे जात आहोत.
मोर्चाला अडवणूक आणि षडयंत्राचा पर्दाफाश – मोर्चाला येणाऱ्या गाड्या अडवल्याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच खडसावले. “तुम्ही कोणाचे घरगडी आहात का? हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
- घुलेवाडी येथील घटना पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप करत थोरात यांनी विविध व्हिडिओ आणि पुरावे जनतेसमोर सादर केले. संग्राम भंडारे कसे खोटे बोलत आहेत आणि त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, हे त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत सिद्ध केले. या षडयंत्रात भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व पुराव्यांनंतर जनतेने संग्राम भंडारेचा तीव्र निषेध केला.
मोर्चाची विविध छायाचित्रे….



थोरात पुढे म्हणाले की,
डॉ. जयश्री थोरात यांनी तरुणांवर दाखल होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांबद्दल आवाज उठवला.