

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या शांती मोर्चा नंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदारांवर हल्ला चढवला आहे. जनतेने पराभव करून तुमचा खुळखुळा केला आहे, आता तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, अशी टीका खताळ यांनी केली. तालुक्यातील विकासकामांची घडी बसत असल्यानेच तुम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत, मात्र जनतेला तुमचे बेगडी हिंदुत्व ओळखता आले आहे, असेही ते म्हणाले.
गुरुवारी निघालेल्या शांती मोर्चानंतर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले यात खताळ यांनी माजी आमदारांवर कटकारस्थानाचा आरोप करत, त्यांच्या स्विय सहायकानेच कीर्तनात गोंधळ घातला आणि आता सहानुभूती मिळवण्यासाठी भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले असल्याचा दावा केला. यापूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तेव्हा तुमची सद्भावना कुठे गेली होती, असा सवाल केला.
माझा डीएनए वारकरी सांप्रदायातील असून, माजी आमदार माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात राहुल गांधीच त्यांना घरात बसवतील आणि रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून त्यांना अधिक चांगली समज मिळेल, असं म्हटलं आहे.
तालुक्यात कोणताही गुंडगिरी सुरू नसून विकासकामांची घडी चांगल्या पद्धतीने बसत आहे. ज्यांची राजकीय घडी विस्कटलेली आहे, तेच अस्वस्थ झाले आहेत. मागील आठ महिन्यांत तालुक्याच्या विकासाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून, विधानसभेतही मी सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवत असल्यामुळेच माजी आमदारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यापलीकडे काहीही राहिले नाही.
माजी आमदारांची ४० वर्षांची अपयशी कारकीर्द उघड झाल्याचे शल्य त्यांना आहे. त्यामुळे ते तालुका अशांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खताळ यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार असून, पराभवाच्या भीतीपोटीच माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अशांतता निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. सत्यजीत तांबे यांच्या राजकीय वक्तव्यावर बोलताना खताळ यांनी, ते सत्तेच्या जवळ असल्याचे सांगत असले, तरी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात प्रचार का केला, असा प्रश्न उपस्थित केला.





