महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | अनंत पांगारकर
संगमनेर – पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बोलविण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. चर्चेत शांतता समिती संदर्भात मुद्दे उपस्थित झाल्यानंतर गणेश मंडळांमधील वादावरून शाब्दिक गुद्द्याची बाचावाची आणि नेहमीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर दोन मंडळांमधील वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी देऊ नका अशा स्पष्ट सूचना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला दिल्या.
येत्या बुधवारी (२७ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावली होती.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्यासह बहुतांशी विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित असले तरी दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली होती. त्यांच्या गैरहजेरीतच नेमका बनावट दारूचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाने कायद्याची पायमल्ली खपवून घेऊ नये बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी. दोन गणेश मंडळ वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी देऊ नका. विसर्जन मिरवणुकीचे नियोजन प्रांताधिकारी व पोलीस उपअधीक्षकांनी तेरा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन करावे. गणेश मंडळाची जागा वादग्रस्त नसावी तसेच देखाव्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना भडकतील, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नका. आपला गणेशोत्सव इतरांसाठी त्रासदायक बनायला नको. मिरवणुकीमध्ये डीजे टाळून पारंपारिक वाद्याचा वापर करा. लेझरचे डीजे प्रशासनाने आहेत त्या स्थितीत जप्त करावेत, अशा सूचना त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व प्रशासनाला दिल्या. बैठकीदरम्यान दोन गणेश मंडळाच्या परवानगी वरून बैठकीत जोरदार वाद झाला.
माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी गेल्या वर्षभरात संगमनेर शहराची वाटचाल गुन्हेगारीकडे होत असून मोबाईल सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी सत्र राबविले जाते. नशेबाजांमुळे सामान्य नागरिकांना रस्त्याने फिरणे अवघड झाले आहे. युवा पिढी बरबादीकडे जात असून स्थानिक पोलीस प्रशासनाने कठोरपणे पोलीसिंग करण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले.
माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी संगमनेर शहरांमध्ये तीस-चाळीस लाख रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे नियंत्रण नेमके कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित केला. सीसीटीव्हीची सद्यस्थिती प्रशासनाने स्पष्ट करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी निधी अभावी मेंटेनन्स करता येत नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर मुर्तडक यांनी मेंटेनन्ससाठी गणेश मंडळांना प्रत्येकी पोलीस प्रशासनाला एक हजार रुपये देण्याचे आवाहन केले.
ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी वीज वितरण कंपनीचा महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालत गेल्या अनेक वर्षांपासून वीज कंपनी गणेश मंडळांकडून डिपॉझिटच्या नावाखाली मोठी रक्कम घेत असते. दरवर्षी या रकमेत वाढ होते व अनामत रक्कम परत मिळत नाही त्यामुळे अशा अनामत ठेवी असलेल्या गणेश मंडळाकडून वीज वितरण कंपनीने अनामत रकमेची मागणी न करता झालेल्या वीज वापराचे बिल आकारावे अशी मागणी केली.
नगरपरिषद पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी शांतता समितीचा मुद्दा उपस्थित केला या समितीविषयी माहिती दिली जावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच बैठकीची सूचना काही ठराविक लोकांनाच दिली जाते ही बाब देखील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय माजी नगरसेवक किशोर पवार, शिरीष मुळे, गजेंद्र नाकील, निखिल पापडेजा, विनोद सूर्यवंशी, मंगेश सालपे, माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींनी विविध सूचना केल्या. यावेळी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत शांतता समितीचे मुद्दे, शाब्दिक गुद्दे आणि आणखी बरच काही! मंडळांमधील वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी नाही – अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे
गेल्या वर्षभरात संगमनेर शहराची वाटचाल गुन्हेगारीकडे होत असून मोबाईल सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी सत्र राबविले जाते



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | अनंत पांगारकर 
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की,
नगरपरिषद पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी