

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे ‘जायंट किलर’ आहात, कारण तुम्ही ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, जे ‘खबऱ्या’, ‘खेळणं’ म्हणत होते, त्यांच्या हातात आता आपण खुळखुळा दिलाय खेळण्यासाठी. अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा. थोरात यांच्या स्थानिक संस्थांवरील वर्चस्वावरही त्यांनी टीका केली.
मतदारांनी एका सामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन विरोधकांना ४४० व्होल्टचा झटका दिल्याचं सांगितलं. २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराची रांगच होती. अजूनही ते व्होट चोरी झाली म्हणतात, पण गेल्या ५०-६० वर्षात यांनी काय काय चोरलं, याचा विचार करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी खताळ यांचे कौतुक केले. संजय गांधी योजनेचे पद मिळाल्यावर अमोलने निराधारांना आधार दिला. त्यामुळे संधीचे सोनं करणारा आमदार कोण, तर अमोल खताळ, असे सांगत त्यांनी खताळ यांची प्रशंसा केली. खताळ यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न शिवसेनेच्या मंत्र्यांशी संबंधित असल्याने ते तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील संगमनेरमधील सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात सभेवेळी हे दोघेही अनुपस्थित होते. ते परदेशात असल्याचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. याशिवाय मंत्री शंभूराजे देसाई हे देखील अनुपस्थित असल्याने याची देखील चर्चा रंगली होती. तर खताळ यांनी भाषणात टीका केलेले आमदार सत्यजित तांबे विरोधी की सत्ताधारी याबाबत भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले.
वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगताना एका कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देताना तथाकथित कीर्तनकाराने नथुराम गोडसे व्हावे लागेल असे सांगत मोठा वाद निर्माण केला होता. या अनुषंगाने देखील शिंदे यांनी कोणतेही भाष्य न केल्याने सभेनंतर याची चर्चा सुरु झाली.



