महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहराच्या विकासाबाबत नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होत असून, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही यापूर्वीच महाविकास आघाडीतील तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे व प्रशासकीय काळात हे काम रखडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नवीन लोकप्रतिनिधी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. प्रशासनावर दबाव आणून विकासकामे थांबवली जात आहेत. जनतेने त्यांना ओळखले असून, त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
थेट पाईपलाईन योजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प- १९९१ मध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष असताना शहराची पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रवरा नदीवर भूमिगत बंधारा बांधला आणि १९९२-९४ मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला. त्यानंतर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली, यामुळे संगमनेरकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळाले.
दिवटे यांनी पुढे सांगितले की, संगमनेरमधील सध्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प उत्तम स्थितीत कार्यरत आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २ मार्च २०२१ रोजी निळवंडे येथे नवीन, अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच याला मंजुरी दिली होती. मात्र, २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर काही व्यक्तींनी हा प्रकल्प थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
४.५ कोटींचा निधी इतरत्र वापरल्याचा आरोप- नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी मंजूर झालेल्या ७ कोटी रुपयांपैकी ४.५ कोटी रुपये म्हाळुंगी पुलासाठी वापरले गेले, तर उर्वरित अडीच कोटी रुपये कोणत्या तालुक्यात गेले, याची माहिती कोणालाच नाही. तालुक्याचा निधी बाहेर पाठवून विकासकामात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
विकास कामांमध्ये अडथळे- मागील काही महिन्यांपासून शहरात अनेक विकासकामे रखडली आहेत. प्रशासनावर दबाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपालिकेने केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे, परंतु गेल्या आठ महिन्यांत शहरात अस्थिरता वाढली असून, बाजारपेठ आणि व्यापार ठप्प झाल्याचे ते म्हणाले.
इतर विकासकामांचा आढावा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा: आमदार सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
एमआयडीसी: संगमनेर एमआयडीसीमध्ये १५५ उद्योग कार्यरत असून, सुमारे ६,५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. विस्तारित एमआयडीसीसाठी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे प्रयत्नशील आहेत.
नाशिक-पुणे रेल्वे: ही रेल्वे संगमनेरहूनच जावी यासाठी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केला आहे.
या पत्रकार परिषदेत किशोर पवार, नितीन अभंग आणि सोमेश्वर दिवटे यांनी नवीन लोकप्रतिनिधींनी कोणताही विकास केला नसून, ४० वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारत केवळ तालुक्याची बदनामी करत असल्याचा आरोप केला.
नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहितीतून जनतेची दिशाभूल : माजी पाणीपुरवठा सभापतींचा आरोप
नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी मंजूर झालेल्या ७ कोटी रुपयांपैकी ४.५ कोटी रुपये म्हाळुंगी पुलासाठी वापरले गेले, तर उर्वरित अडीच कोटी रुपये कोणत्या तालुक्यात गेले, याची माहिती कोणालाच नाही.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
४.५ कोटींचा निधी इतरत्र वापरल्याचा आरोप- 
