

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे. बुधवारी, (२७ ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सुरू होणारा हा मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढे जाणार असल्याने, जिल्हा प्रशासनाने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शेवगावपासून पारनेरपर्यंतच्या रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. हा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात कर्हेटाकळी (ता. शेवगाव) येथे प्रवेश करेल आणि त्यानंतर घोटण, तळणी, शेवगाव शहर, ढोरजळगाव, मिरी, माका, जेऊर, दुधडेअरी चौक, नवनागापूर, नेप्ती, भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वरमार्गे पारनेर तालुक्यातील काळेवाडीहून पुणे जिल्ह्याच्या आळेफाट्याकडे रवाना होईल. हा मोर्चा २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे या बंदोबस्ताचे प्रमुख असतील. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण मार्गाला तीन सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या बंदोबस्तासाठी एकूण ८५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले जातील. यात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ७९ सहायक व उपनिरीक्षक, ६३९ पुरुष अंमलदार आणि ८० महिला अंमलदार यांचा समावेश आहे. तसेच, एक दंगल नियंत्रण पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) देखील सुरक्षेसाठी तयार ठेवले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्याच्या नागरिकांना देखील शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.



अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली
