
संगमनेर-
एका तथाकथित कीर्तनकाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात आता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातील पूर्वापार चालत आलेली पुरोगामी आणि वारकरी संप्रदायाची चांगली परंपरा जपण्यासाठी, तसेच समाजात विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला आहे.
गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी मिळून गावातील सलोखा आणि शांतता टिकवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला.यावेळी, सत्य बाजूने उभे राहिलेल्या वारकरी संप्रदायातील मान्यवर, कीर्तनकार, पत्रकार आणि समाज प्रबोधनकारांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
गावात अशांततेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते, असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. गावाची विकासाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ही वैभवशाली परंपरा टिकवण्यासाठी गावकरी कटिबद्ध आहेत. गावात शांतता आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार केला.
यावेळी बोलताना सिताराम राऊत म्हणाले की, घुलेवाडी हे गांधी विचारांचे गाव आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर गावाने दहा दिवस दुखवटा पाळला होता. या गावात नथुरामच्या विचारांना कधीही थारा दिला जाणार नाही. गावात विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे आवाहन त्यांनी केले. अनेक जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहत असून, ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

ह.भ.प. सखाराम महाराज तांगडे म्हणाले की, वारकरी संप्रदायाने सर्वधर्मसमभावाची मोठी देणगी समाजाला दिली आहे. मानवता हाच वारकरी संप्रदायाचा मूळ विचार आहे. काही लोकांनी या तत्त्वांमध्ये घुसखोरी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सत्य बाहेर आल्याने असे लोक शांत झाले आहेत. संत-महात्म्यांचे विचार घेऊन सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कानिफनाथ ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाले यांनी सांगितले की, गावात राजकीय स्वार्थासाठी काही मंडळी जाणूनबुजून तेढ निर्माण करत आहेत, परंतु जनतेने अशा लोकांना ओळखले आहे. तर भास्कर पानसरे यांनी, गावातील गटा-तटाचा फायदा बाहेरचे लोक घेत असल्यामुळे गाव बदनाम होत आहे, असे सांगत सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचा विश्वास व्यक्त केला. तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पानसरे यांनीही सोशल मीडियावरील टीकाटिप्पणी लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले. नामदेव गायकवाड यांनी, अमृत उद्योग समूहातील विविध कर्मचारी गावच्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या आपुलकीने सहभागी होत असतात. त्यांच्या सहभागातून गावच्या व्यापारामध्ये नक्कीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान ही झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या बैठकीला सिताराम राऊत, ह.भ.प. सखाराम महाराज तांगडे, सरपंच निर्मला राऊत, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पानसरे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कारभारी पानसरे, भास्कर पानसरे, भागवत काशीद, रामनाथ राऊत, मच्छिंद्र ढमाले, ह.भ.प पोपट आगलावे, रायभान राऊत, माजी पंचायत समिती सदस्य सुनील राऊत, उपसरपंच अनिल राऊत, नामदेव गायकवाड, भाऊसाहेब पानसरे, राजू खरात, एकनाथ राऊत, रवि गिरी, चंद्रकांत क्षीरसागर, दत्तू राऊत, अनिल के. राऊत, प्रतिभा ढमाले, माया पराड, शितल राऊत, सुनिल रोकडे, निलेश सातपुते, बाजीराव पानसरे, पल्लवी त्रिभवन, हरि ढमाले, रमेश राऊत आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


