दूध संघाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही संकेत
संगमनेर –
संगमनेर तालुक्याचा विकास शेतकरी व सहकाराच्या भक्कम पायावर उभा असून शेतकरी, उत्पादक हाच तालुक्याच्या विकासाचा पाया आहे. येथील सहकारामुळे आपली बाजारपेठ समृद्ध झाली असून, ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना थोरात यांनी, तालुक्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून तालुक्यात खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि लोकांना रोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, पण आता अनेक ‘जलदूत’ पुढे यायला लागले आहेत. आज इतरांना त्रास होतोय, उद्या तो तुम्हालाही होईल. ज्यांचा संबंध नाही त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आणि तालुक्याची सामाजिक व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहणे आवश्यक आहे.
या सभेत, संगमनेरच्या ‘दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका’ या प्रवासात दूध व्यवसायाचे मोठे योगदान असल्याचे थोरात यांनी सांगितले. सध्या तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून, या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. राजहंस दूध संघाचे कौतुक करताना ते म्हणाले की, गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे संघाचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेच्या ५० वर्षांच्या वाटचालीची प्रशंसा करताना, थोरात यांनी दूध व्यवसाय अत्यंत कष्टाचा आणि मेहनतीचा असल्याचे सांगितले.
सहकारी दूध संघांमुळे खाजगी संघांवर अंकुश राहतो, त्यामुळे ते मनमानी करू शकत नाहीत. मात्र, सहकारी संस्थांवर अनेक निर्बंध असून ते खाजगी संस्थांवर नाहीत, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले. तसेच, बाजारपेठेत मिळणाऱ्या बनावट पनीरबद्दल त्यांनी नागरिकांना सावध केले. एक किलो पनीर बनवण्यासाठी किमान ३०० रुपये खर्च येतो, त्यामुळे १५० रुपयांमध्ये मिळणारे पनीर कसे असेल, याची खातरजमा प्रत्येकाने करावी, असे आवाहन केले.
गोहत्या बंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अशी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. त्यामुळे, सरकारने याबाबत तातडीने पर्यायी व्यवस्था करावी. शेतकरी व दूध उत्पादकांच्या विविध अडचणी असून सरकारने त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी थोरात यांनी केली.
यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी राजहंस दूध संघाच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा दूध संघ महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असून, त्याचे कामकाज इतर संस्थांसाठी दिशादर्शक आहे. दिवसेंदिवस सहकारी संस्था पुढील प्रश्न बदलत चालले आहे. दूध व्यवसायामध्ये अस्थिरता आहे.
दरम्यान, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी संघाच्या कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले, यावर्षी संघाने १२ कोटी ५१ लाख लिटर दुधाचे संकलन केले असून, ५५१ कोटींची आर्थिक उलाढाल केली आहे. माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देशासाठी एक आदर्श बनला आहे. त्यांनी यावर्षी दूध संघाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही सांगितले.
या सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, आर. बी राहणे, इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, के. के. थोरात, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, सुभाष आहेर, सुनील कडलग, अविनाश सोनवणे, डॉ. गंगाधर चव्हाण दूध संघाचे संचालक, विलास वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, भारत मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



संगमनेर – 
सहकारी दूध संघांमुळे खाजगी संघांवर अंकुश राहतो,
