संगमनेर – मोहसीन शेख
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले.
कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये विविध प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांची कामे समाविष्ट होती. परंतु, प्रशासकीय राजवट सुरू झाल्यामुळे ही सर्व कामे रखडली आहेत.
प्रशासकीय कालावधीत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाचे धोरण केवळ ‘वेळ मारून नेण्याचे’ असून, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळेच संगमनेरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचे वातावरण आहे.
डॉ. दानिश खान यांची गांधीगिरी- याच पार्श्वभूमीवर, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आवाज उठवला. लखमीपुरा भागातील रस्ता चार वर्षांपूर्वी मंजूर होऊनही त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. खान यांनी गुरुवारी या रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून गांधीगिरी आंदोलन केले. त्यांच्या या अभिनव आंदोलनाला प्रभागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे संगमनेर शहरातील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संगमनेर शहराची विकासाची गती वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तातडीने होणे गरजेचे आहे, अशी मागणी या आंदोलनामुळे पुन्हा एकदा जोर धरत आहे.
प्रशासनाला इशारा-
यावेळी बोलताना डॉ. दानिश खान यांनी सांगितले की, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चार वर्षांपूर्वी हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, पण नागरिकांचे हाल होता कामा नयेत. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल.






प्रशासकीय कालावधीत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष
संगमनेर शहराची विकासाची गती वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी