विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) केली आहे. यासोबतच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, पहिल्या टप्प्यात 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही मदत देण्यासाठी केवायसीच्या अटी शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्डच्या आधारे दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती संकलित झाल्यानंतर खरडलेली जमीन, विहिरी, घरांचे नुकसान यासह तातडीच्या मदतीसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाईल. दिवाळीपूर्वी सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर घोषणा येत्या आठवड्यात करण्यात येईल.
ओला दुष्काळ हा शब्द मॅन्युअलमध्ये नसला, तरी मंत्रिमंडळाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाप्रमाणेच टंचाईसदृश परिस्थिती समजून सर्व सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी सवलती लागू करण्याची घोषणा
पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती संकलित झाल्यानंतर खरडलेली जमीन, विहिरी, घरांचे नुकसान यासह तातडीच्या मदतीसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाईल.



विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना
पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती संकलित