
संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पडाव्यात यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमधील स्थानिक रहिवासी (होमटाऊन रेसिडेंट) पोलीस कर्मचाऱ्यांची, विशेषतः एका वादग्रस्त कॉन्स्टेबलची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सोमवारी (६ ऑक्टोबर) शिवसेना पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना अंतिम झाली असून नगराध्यक्षपदाच्या सोडतीही पार पडल्या आहेत. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात एका स्थानिक आणि वादग्रस्त कॉन्स्टेबलचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हा कर्मचारी स्थानिक राजकारणात अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक लाभासाठी विविध माध्यमांतून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, असा गंभीर आरोप अमर कतारी यांनी केला आहे.
या वादग्रस्त कर्मचाऱ्याकडून त्याच्या पदाचा दुरुपयोग करून स्थानिक व्यापारी वर्गाला हेतुपुरस्सर त्रास दिला जातो आणि त्यांच्याकडून अवैध आर्थिक लाभ मिळवला जातो, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, या कर्मचाऱ्याने संगमनेरमधील विविध अवैध व्यवसायिकांशी हातमिळवणी करून मोठे आर्थिक संबंध जोपासले आहेत, यामुळे पोलिसांच्या अनेक धडक मोहिमांना अपयश येते.
या कर्मचाऱ्याचा भाऊ देखील नगर येथील एका विशिष्ट पथकात कार्यरत असून, दोघे संगनमताने अवैध व्यावसायिकांशी हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवतात, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अत्यंत संवेदनशील असणाऱ्या निवडणुकीच्या काळात हा वादग्रस्त कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असणे अयोग्य व नियमबाह्य आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.

तात्काळ कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – हा सर्व प्रकार लक्षात घेऊन, सदर स्थानिक कर्मचाऱ्याला तातडीने त्याच्या होमटाऊनमधून इतरत्र वर्ग करावे, अशी विनंती पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याकडे करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय, निष्पक्षरीत्या व शांततेत पार पडतील, असे पक्षाने म्हटले आहे.
सदर विषय अत्यंत तातडीचा व संवेदनशील स्वरूपाचा असून, त्यावर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास शिवसेनेच्या वतीने अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे या मागणीवर काय भूमिका घेतात, याकडे संगमनेरमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे निवेदन देताना शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज भाई शेख, जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते, उप तालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, अमित फटांगरे, रंगनाथ फटांगरे, योगेश खेमनर, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, लखन सोन्नर, युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, संभव लोढा, वैभव अभंग, एकनाथ खेमनर, उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, रवी गिरी, बाळासाहेब कवडे, सदाशिव हासे, गोकुळ लांडगे, वैभव लांडगे, बाबा शिंदे, फैरोज कतारी, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, राजश्री राहणे, वैशालीताई वडतले, राजश्री वाकचौरे, संगीता गायकवाड, आशा केदारी, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, सचिन साळवे, दीपक साळुंखे, आसिफ तांबोळी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

