संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एक सविस्तर पत्र लिहिले असून यात त्यांनी ‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना आमदार तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नुकतेच जिल्ह्याला देण्यात आले आहे. अहिल्यादेवींचे उत्तम प्रशासनाचे कार्य देशाला दिशादर्शक ठरले आहे, परंतु त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आता गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, दरोडे, अवैध धंदे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढल्याने सामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
ड्रग्सचा वाढता विळखा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – पत्रात विशेषतः ‘ड्रग्स’च्या वाढत्या घटनांवर बोट ठेवण्यात आले आहे. ड्रग्स अगदी खेडोपाडी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. याला पोलिसांचे संरक्षण आहे की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशा गंभीर शब्दांत तांबे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाहतूक कोंडी आणि पोलीस यंत्रणेची निष्क्रियता – याव्यतिरिक्त, अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये वाहतुकीच्या (ट्रॅफिक) मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ट्रॅफिक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे की नाही अशी सर्वसामान्यांची भावना झाली असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे. तसेच, जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत झाल्याची बाब जिल्ह्याच्या समाज व्यवस्थेसाठी धोकादायक ठरणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवर शंका – स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यक्षमतेवरही तांबे यांनी शंका उपस्थित केली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आहे की नाही आणि असेल तर ती नेमकी काय करते, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकंदरीत जिल्ह्यामध्ये सध्या पोलीस प्रशासनाचा धाक संपलेला आहे, असे सांगत तांबे यांनी ‘आता पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे’ अशी मागणी केली आहे. यापूर्वी २९ जुलै २०२५ रोजी देखील कायदा सुव्यवस्थेबाबत स्मरणपत्र दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
आमदार तांबे यांनी पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम बनवून पूर्वीप्रमाणे हा जिल्हा आदर्श, गुन्हेगारीमुक्त करावा. तसेच, नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानासारखा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आदर्शवत उपक्रम तातडीने राबवावा.
एसपी साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याला ‘कायद्याचा बालेकिल्ला’ बनवा; आ. सत्यजीत तांबे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानासारखा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आदर्शवत उपक्रम तातडीने राबवावा.



संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना
वाहतूक कोंडी आणि पोलीस यंत्रणेची निष्क्रियता –
