संगमनेर: थोरात कारखान्याने मागील हंगामात दिलेल्या ३२०० रुपये उच्चांकी भावामुळे बाजारपेठ फुलली आणि कामगार, सभासद, ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांची दिवाळी आनंदात गेली. आपला हेतू चांगला असल्याने थोरात कारखान्याचे काम चांगले होत आहे आणि याचमुळे सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारात आदर्शवत ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
थोरात म्हणाले, बदलत्या परिस्थितीनुसार बदल स्वीकारत आता प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १०० टन ऊस उत्पादन केले पाहिजे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस लागवड चांगली झाली आहे. यंदा ९ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप होणे अपेक्षित असून, पुढील वर्षी १५ लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. जास्त गाळप झाल्यास बगॅस जास्त निघतो, ज्यामुळे को-जनरेशन चांगले होते आणि युनिट एक्सपर्ट होते.
थोरात यांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासोबतच वेळेवर ऊस कारखान्याकडे आणण्याचे आवाहन केले. सर्व शेतकऱ्यांनी एकरी १०० मे.टन ऊस उत्पादन होईल यासाठी काम करावे. याचबरोबर कार्यक्षेत्रातील आणि बाहेरील ऊस सुद्धा वेळेवर येईल यासाठी प्रोग्रॅमप्रमाणे काम करावे. गाळप करताना रिकव्हरी महत्त्वाची असते, त्यामुळे परिपक्व ऊस आणावा. सर्व ऊस लागवड सहाव्या महिन्यात झाल्याने अनेकदा अडचण होते, परंतु परिपक्व ऊस आणला गेला तर चांगले रिझल्ट मिळतील. कारखान्याने कायम वेळेत पगार, बोनस याचबरोबर शेतकऱ्यांचे वेळेत पेमेंट अदा केले आहे आणि बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असल्याने त्यांचेही वेळेत पेमेंट केले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून, कालव्यांच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठी आपण नियोजन केले होते. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि ते शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कामगारांसाठी १ जानेवारीपासून १० टक्के पगारवाढ सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.
अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक आहे. या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी शेतीसाठी कंपोस्ट खताचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी बोलताना जुन्या पिढीने सायकलपासून ते आत्तापर्यंत सर्व अनुभवले असून, नवीन पिढीला सर्व ‘रेडीमेड’ मिळाले आहे. यामागील जुन्या लोकांचे कष्ट नव्या पिढीला माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जपण्यासाठी आपल्याला सर्वांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, डॉ. जयश्री थोरात, तसेच कारखान्याचे संचालक मंडळ, अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी, सभासद, शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल मीडियाचा वापर बदनामीसाठी होतोय…
आपले काम चांगले आहे, सहकार चांगला आहे, अनेकांची जीवन फुलली आहेत. मात्र, काही लोकांना ते सहन होत नाही. काम न करता राजकारणाचा सोपा उपाय म्हणजे एजन्सी लावून खोट्या रील बनवायच्या, व्हॉट्सॲपवर खोटी माहिती टाकायची आणि खोटा प्रचार करायचा असे उद्योग आणि लोक करत आहेत. जे भाव देत नाहीत, ते हे उद्योग करत आहेत. ते बुद्धीभेद करत आहेत आणि धर्माचा वापर करून तरुणांमध्ये विष कालवत आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.





संगमनेर: थोरात कारखान्याने मागील हंगामात दिलेल्या ३२०० रुपये उच्चांकी भावामुळे बाजारपेठ फुलली आणि कामगार, सभासद, ऊस उत्पादक व व्यापाऱ्यांची दिवाळी आनंदात गेली.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.