

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना संदीप टेमगिरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.
हिवरगाव पावसा परिसरातील टेमगिरे वस्ती येथे शेतात काम करून घरी परतणाऱ्या तीस वर्षीय अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण हिवरगाव पावसा परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि अर्चना टेमगिरे यांच्या तब्येतीची चौकशी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बिबट्यांचा मानवी वस्तीतील वाढलेला संचार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. यापूर्वीही याबाबत तक्रारी केल्या असताना, वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. थोरात यांनी केली. यावेळी हिवरगाव पावसा येथील कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते.
गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या डॉ. जयश्री थोरात यांच्या या राजकारणाविरहित भेटीमुळे आपल्याला मोठे बळ मिळाल्याचे अर्चना टेमगिरे यांनी सांगितले. माझ्यावर अचानक हल्ला झाला, मला कळालेसुद्धा नाही. माझ्या कुटुंबासाठी आणि मुला बाळांसाठी हे मोठे संकट होते. सर्वांच्या कृपार्शिवादाने मला जीवदान मिळाले असून डॉ. जयश्री थोरात यांच्या भेटीने मला बळ मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.



ही माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने
