संगमनेर – एकेकाळी ‘एअरपोर्ट’ म्हणून राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होणारे आणि संगमनेर शहराचे वैभव असलेले हायटेक बसस्थानक मागील वर्षभरापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही हतबल ठरलेल्या पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या आचारसंहितेमुळे साधले. आचारसंहिता लागू होताच रातोरात हे सर्व फ्लेक्स हटले आणि तब्बल एक वर्षानंतर संगमनेरच्या या देखण्या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे.
वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’- लोकनेते तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हायटेक बसस्थानक शहराची ओळख आणि अभिमान आहे. प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण ‘सेल्फी पॉइंट’ बनले आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून संपूर्ण बसस्थानक मोठ्या अनाधिकृत फ्लेक्सने झाकले गेले होते. तत्कालीन पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी हे फ्लेक्स काढण्यास हतबल ठरले होते, असे बोलले जात होते.
फ्लेक्स काढण्याचा प्रयत्न करणारे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागले असल्याच्या चर्चा झडल्या होत्या. फ्लेक्समुळे बसस्थानक चौकाचे विद्रूपीकरण तर झालेच; पण अनेकदा कमानी आणि फ्लेक्समुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते. सिग्नल व्यवस्थाही नीट कळत नव्हती, अशी दुरवस्था झाली होती, तरीही प्रशासनाने कारवाई केली नाही.
मध्यंतरी संगमनेर मधील एका उद्योगपतीने बस स्थानकावर लागणाऱ्या विविध राजकीय फ्लेक्सच्या माध्यमातून बस स्थानकाच्या होणाऱ्या विद्रूपीकरणासंदर्भात समाज माध्यमावर आपले मत व्यक्त केल्यानंतर या उद्योगपतीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अखेरीस उद्योगपतीने समाज माध्यमावरील ती पोस्ट हटविल्यानंतर विषय थांबला होता.
थोरात-तांबे यांनी घालून दिला होता आदर्श – या फ्लेक्सबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदावर असताना स्वतः उभे राहून आपले फ्लेक्स काढले होते आणि फ्लेक्सबाजी करू नये असे आवाहन करून राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श निर्माण केला होता. याच आदर्शाचे पालन करत आमदार सत्यजित तांबे यांनीही गेल्या महिन्यात पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व फ्लेक्स स्वतःहून काढून घेतले होते. तरीही, काही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून फ्लेक्सबाजी सुरूच राहिली, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली होती. वारंवार विनंत्या करूनही पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही.
आचारसंहितेचा ‘चमत्कार’ आणि नागरिकांचा आनंद – नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले आणि रातोरात सर्व अनाधिकृत फ्लेक्स हटवण्यात आले. फ्लेक्स हटताच बसस्थानकाचे मूळ सौंदर्य पुन्हा एकदा दृष्टीस पडले. यामुळे व्यापारी वर्ग सुखावला आहे, तसेच सामान्य नागरिक आणि महाविद्यालयीन तरुणांनी याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.
प्रांजली खेमनर (अंभोरे) आणि तनुजा सोनवणे (चिंचोली गुरव) यांसारख्या विद्यार्थिनींनी “अनेक दिवसांनी संगमनेर बसस्थानक पाहायला मिळाले” असे सांगत, मोकळ्या बसस्थानकाजवळ ‘सेल्फी’ काढून संगमनेरकर असल्याचा अभिमान व्यक्त केला. एकूणच, पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे शक्य झाल्याची चर्चा संगमनेर शहरात रंगली आहे.
♠ जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तो परमनंट फ्लेक्स कमान हटविली – जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक-पुणे महामार्गालगत नेत्यांच्या कमानीचे युद्ध रंगले होते. प्रशासनाकडून कोणती कारवाई होत नसल्याने संगमनेरकर देखील हातबलतेने हे कमान युद्ध बघत होते. मात्र काही दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतल्यानंतर थोरात यांची कमान काढून घेण्यात आली तर दुसरी कमान मात्र जैसे थे होती. ही कमान काढण्यात पालिका प्रशासन देखील हातभार ठरले असल्याचे बोलले जात होते. अखेरीस निवडणूक आयोगाच्या कृपेने आचारसंहितेच्या नावाखाली का होईना रिकामा निघाली याबद्दल संगमनेरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
निवडणूक आयोगाच्या ‘कृपे’ने संगमनेरच्या ‘एअरपोर्ट’ बसस्थानकाचा वर्षभरानंतर मोकळा श्वास! हतबल पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते आचारसंहितेने साधले
मध्यंतरी संगमनेर मधील एका उद्योगपतीने बस स्थानकावर लागणाऱ्या विविध राजकीय फ्लेक्सच्या माध्यमातून बस स्थानकाच्या होणाऱ्या विद्रूपीकरणासंदर्भात समाज माध्यमावर आपले मत व्यक्त केल्यानंतर या उद्योगपतीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.



वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’-
आचारसंहितेचा ‘चमत्कार’ आणि नागरिकांचा आनंद –
