मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण मंत्री, अतुल सावे साहेब यांच्याकडे संगमनेर तालुक्यातील विविध कामांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्याची विनंती केली होती. स्थानिक नागरिकांकडून वारंवार विकासकामांची मागणी होत असल्याने, तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी शासनाकडे केली होती.
तांबे यांनी एकूण ३३ कामांसाठी १०० लाख रुपये (एक कोटी रुपये) निधीची मागणी केली होती. या कामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्ट्रीटलाईट बसवण्याच्या कामांचा समावेश होता. आमदार सत्यजित तांबे यांच्या निवेदनाची दखल घेत, कक्ष अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांना आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अहिल्यानगर यांनी दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, संगमनेर यांना तालुकास्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर आता तांबे यांनी मागणी केलेल्या या कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ७७ लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर, शिंदोडी, शेडगाव, चिंचपूर, घुलेवाडी, जांबूत, दरेवाडी, रणखांब, वेल्हाळे, साकुर, बिरेवाडी, पिंपरणे, कौठे मलकापूर, तिगाव या गावांचा समावेश आहे. तांबे यांच्या या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील वंचित वस्त्यांचा विकास लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
- संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि वाहतूक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी १०० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. यामुळे ग्रामीण नागरिकांना दररोजच्या प्रवासातील अडचणींवर मात करता येईल, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत सुलभता मिळेल आणि विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजपर्यंत सहज पोहोचता येईल. आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मोठी चालना मिळेल. तालुक्यातील प्रत्येक वस्तीपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठीच आहे. – आमदार सत्यजीत तांबे.






मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.