संगमनेर – एकेकाळी ‘सुसंस्कृत व वैभवशाली शहर’ म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेले अवैध धंदे आणि ड्रग्जसह अमली पदार्थांची तस्करी यामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, पालक आणि महिलांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. शहराच्या शांतता व सुरक्षिततेला या घटनांमुळे मोठा धक्का बसला आहे.
शांतता, सुरक्षितता, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण केंद्र, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि समृद्ध बाजारपेठ यांमुळे संगमनेरने राज्यात आपला लौकिक निर्माण केला होता. मात्र, मागील एक वर्षापासून तालुक्यात दडपशाही आणि दहशत वाढत असल्याची भावना निर्माण झाली असून, शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे.
याबाबत ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मुंगसे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, शेजारील तालुक्यांमध्ये घडणाऱ्या या गोष्टी आता संगमनेरमध्येही घडायला लागल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातसुद्धा हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थांसह, ड्रग्ज, इंजेक्शन आणि नशेच्या गोळ्यांचा वाढता प्रसार पाहून पालकवर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक अरविंद गाडेकर यांनी ही बाब तरुण पिढीसाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जोंधळे यांनी या गंभीर विषयाकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे आणि त्यांना संगमनेरसारख्या शहरात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे हे अत्यंत चिंतेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अवैध धंद्यांप्रमाणेच शहराच्या विद्रूपीकरणाचा मुद्दाही चर्चेत आहे. शहरात फ्लेक्सबाजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ज्यांचे कोणतेही सामाजिक योगदान नाही, अशा ‘नव-सामाजिक कार्यकर्त्यांनी’ अनधिकृत फ्लेक्स लावून संगमनेर बस स्थानकासह शहराला विळखा घातला होता. याबद्दल वारंवार आवाज उठवूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, हे अत्यंत चुकीचे होते.
सुदैवाने, आचारसंहिता लागल्यामुळे सर्व फ्लेक्स काढण्यात आल्याने बस स्थानकासह विविध ठिकाणच्या जागांनी मोकळा श्वास घेतला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाने शहराचे विद्रूपीकरण थांबावे यासाठी मोहीम उघडली होती; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे फ्लेक्सबाजी कायम राहिली होती.
एकूणच, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध धंदे त्वरित थांबवून संगमनेर शहराची शांतता व सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
संगमनेर शहरात अमली पदार्थांची तस्करी व अवैध धंद्यांची वाढ; सुसंस्कृत शहराच्या ओळखीला धक्का, नागरिक चिंतेत!
एकूणच, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध धंदे त्वरित थांबवून संगमनेर शहराची शांतता व सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.




संगमनेर – एकेकाळी ‘सुसंस्कृत व वैभवशाली शहर’ म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

